PHOTO : उपोषणकर्ता चार दिवसांपासून बेपत्ता, ग्रामस्थांचा गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या
बुलढाण्यात उपोषणस्थळावरुन बेपत्ता झालेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. रात्रंदिवस हा ठिय्या सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातच रात्र काढली. गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातच ग्रामस्थ झोपले तसंच जेवणही तिथेच करत आहेत. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर हे चार दिवसांपासून बेपत्ता आहेत.
जिल्ह्यातील वरवट खंडेराव गावातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट, नाली बांधकाम इत्यादी कामात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अविनाश येनकर यांनी भ्रष्टाचार केला, असा आरोप करत गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या.
पण चौकशी किंवा कारवाई झाली नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी संग्रामपूर पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचं रीतसर प्रशासनाला कळवलं आणि त्यांनी एकट्यानेच उपोषण सुरु केलं.
14 ऑगस्टला संतोष गाळकर हे पावसाळी दिवस असल्याने त्यांच्या स्वतःच्या पिकअप गाडीत पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले. त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला पंधरा दिवस आधीच कळवल्या होत्या.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी संतोष यांच्या उपोषणाची पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन, त्या दिवशीही दखल घेतली नाही आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संतोष गाळकर हे त्यांच्या उपोषणस्थळाहून बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं.
संतोष हे ज्या गाडीत उपोषणाला बसले होते त्या गाडीत त्यांचे कपडे, चप्पल, चष्मा, मोबाईल अशा सर्व वस्तू गाडीतच आढळून आल्याने नातेवाईकांनी, मित्र मंडळींनी सर्वत्र शोध घेतला. मात्र सायंकाळपर्यंत ते आढळून न आल्याने त्यांच्या मुलाने तामगाव पोलिसात वडील उपोषणस्थळाहून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य तात्काळ ओळखून तक्रार दाखल करुन दोन पथक संतोष यांच्या शोधासाठी रवाना देखील केली. मात्र आता चार दिवस होऊनही संतोष गाळकर यांच्या बेपत्ता होण्याचं रहस्य उलगडलं नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे.
आता ग्रामस्थ आणि कुटुंबियांनीसंतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच ग्रामस्थ झोपले तसंच जेवणही तिथेच करत आहेत.
दरम्यान संतोष गाळकर यांचा मुलगा सुपेश गाळकर याने आपल्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे ग्रामसेवक अविनाश येनकर आणि पंचायत समिती प्रशासनाचा हात असल्याचा आरोप केला आहे
तर गटविकास अधिकारी संजय पाटील म्हणतात ते गायब होण्यामागे आम्हाला काही माहिती नाही आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.