Devendra Fadanvis Tweet on Yavatmal Rain: सध्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात पावसाची (Rain) जोरदार बॅटींग सुरु आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. या अडकेलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्वीट करत दिली आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं ?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत यवतमाळमधील परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. तर भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहचणार आहेत. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच प्रशासन यवतमाळ मधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार यांच्या देखील ते संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 







 जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजांचा कडकडाटांसह पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळाले. आतापर्यंत जिल्ह्यात अगदी कमी कालावधीमध्ये विक्रमी पाऊस बरसला आहे. यामध्ये यवतमाळमध्ये  236 मिलिमीटर, महागाव 231 मिमी,  आर्णी 164 मिमी,  घाटंजी 142 मिमी तर कळंब, दारव्हा दिग्रसमध्ये मिमी आणि इतर तालुक्यांमध्ये  90 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एसडीआरएफची दोन पथकं बचावकार्यसाठी तयार करण्यात आली आहेत. 


यवतमाळला पुराचा वेढा


यवतमाळच्या वाघाडी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी थेट काठावर असलेल्या 50 ते 60 नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे  घरातील धान्य कपडे इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं चित्र आहे. आपला जीव वाचवण्यासाठी कोणी घराचे खोलून वर चढले तर काहींनी झाडाचा आसरा घेतला. जिल्ह्यातील   दारव्हा, नेर,  घाटंजी, पांढरकवडा, उमरखेड, बाभूळगाव-कळंब मार्ग बंद झाले आहेत.तिवसा कारेगाव यावली, कोटंबा, चाणी कामठवाडा आणि नायगाव या गावांना पुराचा वेढा पडला आहे. तर महागावच्या पैंनगंगा शिरफुली,  राहुर गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.