Maharashtra: यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील तेलंगणाच्या काठावरील गावांनी महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) कारभारावर ताशेरे ओढत परराज्यात सामील होण्याची भाषा सुरू केली आहे. पांढरकवडा, वणी आणि झारीजामनी तालुक्यातील  25 पेक्षा अधिक गावांना तेलंगणा राज्यातील विविध योजनांची भुरळ पडली आहे. तेलंगणा (Telangana) राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारच्या योजना तुकड्या पडत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. येत्या काळात पैनगंगाच्या पट्ट्यातील ही गावं तेलंगणात सामील होण्याची धडपड करत असल्याची माहिती खुद सीमावर्ती भागातील शेतकरी बोलून दाखवत आहेत.


पांढरकवडा तालुक्यातील तेलंगणा सीमेजवळ असलेली एकूण 25 गावं तेलंगणातील योजनांच्या प्रेमात पडली आहेत. दिग्रस येथे पूल झाल्याने तसेच तेलंगणाची परिवहन सेवा मिळत असल्याने येथील नागरिकांना आदिलाबादची बाजारपेठ जवळ पडते. तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी 24 तास निशुल्क वीजपुरवठा, किसान सन्मान योजनेचा लाभ देत शेतकऱ्यांना प्रतिएकर 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं, त्यामुळे पैनगंगेच्या पट्ट्यातील 25 गावं तेलगंणाच्या प्रेमात आहेत. अनेकांची शेती या सीमावर्ती भागामध्ये आहे, तिथे मराठीसह तेलगू भाषा बोलली जाते.


यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील महाराष्ट्र राज्याची सीमा पैनगंगा नदीवर संपते. नदीच्या पलीकडून तेलंगणाची हद्द सुरू होते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्याच्या सीमेजवळील पिंपळखुटी या गावच्या पाचशे मिटरवर तेलंगणातील डोलारा हे गाव आहेत. तेलंगाणातील डोलारा गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी केसीआर सरकार 24 तास वीज देते. मात्र, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कधी दिवसा, तर कधी रात्री पाळीत वीज दिली जाते.


विशेष म्हणजे नैसर्गिक अपत्तीमुळे किंवा आत्महत्या झाल्यास तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत नुकसान भरपाई देते. तर त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार 1 लाख रुपये देते, मात्र ते मिळवण्यासाठीही खटाटोप करावी लागते.


पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी हे महाराष्ट्र राज्यातील शेवटचं गाव आहे. पैनगंगा नदीने तेलंगणा आणि महाराष्ट्राला विभागलं आहे. निम्म पैनगंगा धरण महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे 26 वर्षापासून रखडलं आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर, तेलंगणा सरकारने पैनगंगा नदीवर साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून चनाखा गावाजवळ विराट बॅरेजचं काम सुरू केलं आहे, त्यामुळे सीमावर्ती भागातील शेतकरी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.


तेलंगणा सरकारचं शेतकऱ्यांना प्राधान्य


तेलंगणा सरकारने कमी वेळात प्रगती करत तेथील शेतकऱ्यांना सर्व सोईसुविधा देण्यास प्राधान्य दिलं. त्यानंतर तेलंगाणातील आदिलाबाद जिल्ह्यातील 55 गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ आणि तेलंगाणा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीवर साडे तीनशे कोटी रूपये खर्च करून विराट बॅरेजच काम सुरू केलं. विशेष म्हणजे हे काम महाराष्ट्राच्या हद्दीत देखील सुरू आहे. मात्र त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना कवडीचाही होणार नाही.


तेलंगणातील या योजनांचं आकर्षण 



  • शेतकऱ्यांसाठी 24 तास निशुल्क वीज पुरवठा  

  • किसान सन्मान योजनेचा लाभ 

  • रयतूब बंधू योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी, यात शेतकऱ्यांना प्रति एकर 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज 

  • प्रत्येक गावातील रस्ते विकसित 

  • मुलींच्या लग्नासाठी 50 हजार रुपये  

  • घरकुल योजना प्रत्येकासाठी राबवली जाते

  • नैसर्गिक अपत्तीमुळे वा आत्महत्या झाल्यास शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत नुकसान भरपाई


हेही वाचा:


रोहित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट