लंडन : भारतातल्या बँकांना तब्बल 9 हजार कोटींनी चुना लावून पळ काढलेला विजय मल्ल्या एबीपी नेटवर्कच्या कॅमेऱ्यासमोर आला. बर्मिंघममध्ये मॅच पाहायला आलेल्या मल्ल्याला एबीपी न्यूजच्या पत्रकारानं गाठलं. मात्र यावेळीही मल्ल्यानं एबीपीच्या पत्रकाराला उद्धट उत्तरं दिली.


काल गुरुवारी लंडनमध्ये फिरताना विजय मल्ल्या एबीपी न्यूजच्या पत्रकाराला दिसला. साहजिकच मल्ल्याशी बोलण्याचा प्रयत्न पत्रकारानं केला. मात्र मल्ल्यानं उद्धट उत्तरांशिवाय काहीच सांगितलं नाही. पत्रकारानं सर्वात आधी मल्ल्याच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं मल्ल्यानं टाळलं. त्यानंतर पत्रकारानं मल्ल्याला क्रिकेट मॅच एन्जॉय केली का अशी विचारणा केली. त्यावर मी मॅच एन्जॉय केली पण भारतीय संघाच्या निकालांवर समाधानी नसल्याचं सांगितल.

त्यानंतर एबीपी न्यूजच्या पत्रकारानं मल्ल्याला भारतात पुन्हा कधी येणार असा प्रश्न विचारला, यावर तुम्ही इथे मॅच पाहायला आला आहात, की मी भारतात कधी येणार हे जाणून घ्यायला असा उद्धट प्रतिप्रश्नच मल्ल्यानं पत्रकाराला विचारला.

विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याने 15 महिन्यांपूर्वी भारत सोडून लंडनला पळ काढला होता. भारताने यंदा 8 फेब्रुवारी रोजी ब्रिटनकडे विजय मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. ही याचिका मार्चमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे पाठवली होती.

व्हिडिओ :