कोलंबो : श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सरकारने चेहरे झाकणारे सर्व पेहराव, कपडे आणि मास्कवर बंदी घातली आहे आहे. राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "लोकांची ओळख पटवण्यात अडचण निर्माण होणाऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. हे लोक राष्ट्रीय किंवा सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका ठरु शकतात. हा आदेशाची आज 29 एप्रिलपासून तातडीने लागू होत आहे."


आजपासून लागू झालेल्या या बंदीमध्ये मुस्लीम महिला परिधान करत असलेल्या नकाब किंवा बुरख्याचा उल्लेख नाही. पण सरकारच्या या निर्णयाचा परिणा बुरखा आणि नकाब परिधान करणाऱ्या महिलांवरही होणार आहे.

श्रीलंकेत ईस्टर सण्डेला चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटात 500 नागरिक जखमी झाले होते. काही दिवसांनी दहशतवादी संघटना आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी अशी पावलं उचलणाऱ्या देशामध्ये श्रीलंकेचा समावेश झाला आहे. याआधी आशिया, आफ्रिका, युरोप या खंडातील काही निवडक देशांनी हा निर्णय घेतला होता. चॅड, कॅमरुन, गाबोन, मोरोक्को, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियम, आणि उत्तर-पश्चिम चीनमधील मुस्लीमबहुल शिनजियांग प्रांतात बुरखा परिधान करण्यावर बंदी आहे.

कायदे मंत्र्यांना मसुदा बनवण्याच्या सूचना
श्रीलंकन सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, "पंतप्रधानांनी कायदे मंत्र्यांना याबाबत एक मसुदा तयार करण्यास सांगितलं होतं. तसंच कायदे मंत्र्यांनी श्रीलंकेतील मुस्लीमांच्या धर्मगुरुंची प्रमुख संस्था आयसीजेयूच्या अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करुन मसुदा तयार करावा, असंही पंतप्रधानांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे आयसीजेयूने स्वत:च एक प्रस्ताव मंजूर करुन चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घालावी असं आवाहन सरकारला केलं होतं."

कट्टरतावादी संघटनांवर बंदी
नॅशनल तौहीद जमात ही कट्टरतावादी इस्लामी संघटना श्रीलंकेतील बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. हे आत्मघाती हल्लेखोर इस्लामिक स्टेटपासून प्रभावित असल्याचं सरकारने सांगितलं.

या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेच्या सरकारने अशाप्रकारची अनेक पाऊलं उचलली आहेत. राष्ट्रपतींनी नॅशनल तौहीद जमात आणि जमियत मिल्लत इब्राहिम यांसारख्या संघटनांवर बंदी घातली आहे. या संघटनांची कार्यलयं सील केली असून त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसंच सरकार आणखी काही संघटनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.

संबंधित बातम्या

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी आयसिसने स्वीकारली

श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी लागू होणार, राष्ट्रपतींची घोषणा

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार

श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीयांसह 290 जणांचा मृत्यू