Russia Ukraine War Ceasefire : मागील काही दिवसांपासून युक्रेनवर जोरदार हल्ले करणाऱ्या रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये काही तासांसाठी एकतर्फी शस्त्रसंधी लागू केली आहे. युक्रेनमध्ये युद्धग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना पोहचवण्यासाठी, त्यांची सुटका करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रशियाने म्हटले. मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये ही शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. रशियाच्या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. तिसरी फेरी आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.


रशियन सरकारची वृत्तसंस्था स्पुतनिकने याबाबतचे वृत्त दिले आहे. मॉस्कोतील स्थानिक वेळ सकाळी 10 वाजल्यापासून रशियाने शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. मानवीय दृष्टीकोणातून नागरिकांना आवश्यक मदत पोहचवण्यासाठी आणि इतर सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरीत करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. 






 


 




भारताने केले होते शस्त्रसंधीचे आवाहन 


रशिया आणि युक्रेनने शस्त्रसंधी लागू करण्याचे आवाहन भारताने केले होते. ही शस्त्रसंधी लागू झाल्यास तीन हजार भारतीयांना या युद्धग्रस्त भागातून सुखरूप मायदेशी आणता येईल. खारकीव्ह आणि सुमी या पूर्व युक्रेनच्या भागात मोठ्या प्रमाणावर हल्ले-प्रतिहल्ले, गोळीबार सुरू असल्याने भारतीयांची सुटका करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. 


पूर्व युक्रेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भागातून भारतीयांना सुखरूप आणणे ही आमची प्राथमिकता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार सांगितले होते. युद्धविराम झाल्यास भारतीयांना तातडीने मायदेशी आणता येईल. बॉम्ब हल्ले, गोळीबार सुरू असताना भारतीयांची सुटका करणे हे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. युद्धक्षेत्रात काहीही घडू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरक्षित असलेले ठिकाण सोडू नये असे वाटतं, असेही त्यांनी म्हटले. 


रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रशियन अधिकाऱ्यांनी खारकीव्ह आणि सुमी या भागातून भारतीयांना रशियातील बेल्गोर्ड या शहरात नेण्यासाठी 130 बसची व्यवस्था करण्याची तयारी दशर्वली आहे. याबाबत बागची म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आसरा घेतलेल्या ठिकाणापासून 50 ते 60 किमी अंतरावर ही बसेस असणार आहेत. तिथंपर्यंत जाण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केल्यास भारतीयांची सुखरूप सुटका करता येईल, असेही त्यांनी म्हटले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: