एक्स्प्लोर
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाककडून 30 भारतीय कैद्यांची सुटका
आजच्या घडीला 418 मच्छिमारांसह 470 भारतीय पाकिस्तानमधील तुरुंगात आहेत. त्यातील 27 मच्छिमार आज लाहोरमध्ये पोहोचले. त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.

इस्लामाबाद : पाकिस्तानने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 27 मच्छिमारांसह 30 भारतीय कैद्यांची तुरुंगातून मुक्तता केली आहे. मानवतेच्या मुद्द्यांचं राजकारण न करण्याच्या पाकिस्तानच्या धोरणांनुसार कैद्यांची मुक्तता करण्यात आली असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. ज्या 30 कैद्यांची सुटका करण्यात आली, त्यामध्ये 27 मच्छिमारांचा समावेश आहे. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असतो. या दिवसाला मानवी भावनेची जोड आहे. आम्हाला आशा आहे की, भारताकडूनही असेच पाऊल पडेल, असे पाकिस्तानच्या प्रवक्त्यांनी म्हटले. आजच्या घडीला 418 मच्छिमारांसह 470 भारतीय पाकिस्तानमधील तुरुंगात आहेत. त्यातील 27 मच्छिमार आज लाहोरमध्ये पोहोचले. त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. कराचीच्या मालिर जेलचे वरिष्ठ जेल अधीक्षक गुलाम बक्श यांनी सांगितले की, “काल भारतीय मच्छिमारांची सुटका केली आणि गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर त्यांना ट्रेनच्या माध्यमातून लाहोरला पाठवलं. मानवी सद्भवानेच्या मुद्द्यावर मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे.” अरबी समुद्रात दोन्ही देशांच्या सीमांचे सीमांकन स्पष्ट नसल्याने पाकिस्तानातील मच्छिमार भारतात आणि भारतातील पाकिस्तानात येत-जात असतात. त्यामुळे दोन्हीकडून पलिकडील देशांच्या मच्छिमारांना अटक केली जाते.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?






















