नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने प्रशांत महासागरात सर्वात शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे. हा हायड्रोजन बॉम्ब आण्विक बॉम्बपेक्षा अनेक पटींनी धोकादायक आहे. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकल्यास अनेक देशांना त्सुनामीचा धोका आहे.


हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकल्यास यामुळे मोठ्या लाटा तयार होऊ शकतात. ज्यामुळे त्सुनामाची धोका आहे. याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो.

संयुक्त राष्ट्र संघातील भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला नेस्तनाबूत करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर उत्तर कोरियाने या धमकीची खिल्ली उडवत हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची धमकी दिली.

हायड्रोजन बॉम्बचा कोणकोणत्या देशांवर परिणाम होणार?

जाणकारांच्या मते, उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बने हल्ला केला जाऊ शकतो. लढाऊ विमानाद्वारे किंवा मिसाईलद्वारे प्रशांत महासागरात हा बॉम्ब टाकला जाऊ शकतो. यामुळे अमेरिकेशी चांगचे संबंध असणाऱ्या जपान आणि दक्षिण कोरियामध्ये त्सुनामी येऊ शकते.

भारतावर काय परिणाम होणार?

उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बस्फोट घडवून आणल्यास त्याचा भारतावरही परिणाम होणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. हा प्रश्न यामुळे निर्माण होतो की, जपानमध्ये त्सुनामी आली तेव्हा भारतातही अलर्ट जारी करण्यात आला होता. तर इंडोनेशियामध्ये त्सुनामी आली त्यावेळी चेन्नईपर्यंत त्याचा परिणाम जाणवला होता. त्यामुळे उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बचा परिणाम भारतावरही होऊ शकतो.

जगभरात आतापर्यंत 2 हजार पेक्षा जास्त वेळा आण्विक बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आला आहे. यापैकी 100 स्फोट समुद्रात घडवून आणण्यात आले. मात्र पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी 1963 साली यावर बंदी घालण्यात आली. समुद्रात स्फोट घडवून आणल्यामुळे भूकंप, त्सुनामी आणि भूस्खलनाचा धोका निर्माण होतो. मात्र हे स्फोट अशा ठिकाणी घडवून आणण्यात आले, जिथे कमी नुकसान होईल.

उत्तर कोरियाला आण्विक बॉम्ब मिळवून देण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्तानने उत्तर कोरियाकडून नोडोंग मिसाईलच्या बदल्यात आण्विक बॉम्बचं डिझाईन घेतलं होतं. यावेळी चीनने दोन्हीही देशांचं समर्थन केलं होतं.