वॉशिंग्टन : ‘नासा’ने गेल्या दहा दिवसातील भारताचे काही फोटो प्रसिद्ध केले असून, या फोटोंमध्ये देशातील अनेक भागात आगीचे लोण पसरल्याचं दिसत आहे. ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह दक्षिण भारतातील अनेक राज्यात आगीचे लोण पसरलेल्याचे दिसत आहे.


या आगींमुळे वातावरणात ब्लॅक कार्बनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण वाढीत भर पडली आहे. विशेष म्हणजे, आगीच्या भक्षस्थानी पडलेला सर्वाधिक भागात जंगल असल्याचं सांगितलं जात आहे.

पण ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी हा दावा फेटाळला आहे. वैज्ञानिकांच्या मते, ज्या भागात आगीचे लोण दिसत आहेत. त्यापैकी सर्वाधिक भागात शेतजमीन असल्याचे सांगितले आहे. जंगलात पेटलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवणं अशक्य असतं. तसेच, या आगीमुळे वातावरणात सर्वत्र धुराचे लोळ आणि धुकं पसरतं, असंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे कृषी तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षात शेतमजुरांची मजुरी वाढल्याने, हार्वेस्टरचा वापर वाढला आहे.त्यामुळे पिकांच्या कापणीनंतर पिकांचा खालचा भाग मुळासकट काढून टाकण्यासाठी आग लावली जाते.

'नासा'ने जे फोटो प्रसिद्ध केले आहेत, त्या भागात तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी उपकरणांसाठी या वर्षी 1,140.30 कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद दुप्पट आहे. दिल्ली एनसीआर भागात शेतातील पीक काढणीनंतर खुंट जाळण्यासाठी आगी लावल्या जातात. यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ही तरतूद केल्याचे सांगितले जात आहे.