बीजिंग : भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी शांततापूर्वक तोडगा काढण्याचा चीन करत असला तरी चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने भारतात सुरु असलेल्या 'बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स' मोहीमेवरुन निशाणा साधला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं एवढं सोपं नाही. आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनल्या असून त्या हटवणं कठीण आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम पूर्णपणे अपयशी ठरेल, असं ग्लोबल टाईम्सने आपल्या लेखात म्हटलं आहे.


भारत-चीन सीमेवरील तणावरुन देशात चिनी वस्तूंचा विरोध सुरु असून 'बायकॉट चायना प्रॉडक्ट्स' अशी मोहीमही सुरु करण्यात आली आहे. परंतु यावरुन चवताळलेल्या चीनने आपल्या लेखातून भारताला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. काही अतिदेशप्रेमी भारतीयांमुळे चीनविरोधी वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्सने केला आहे. या लेखात लिहिलं आहे की, "काही जण आमच्या वस्तूंविरोधात अफवा पसरवत आहेत. पण या वस्तूंवर बहिष्कार घालणं एवढं सोपं नाही. या वस्तू भारतीय सामाजातील अविभाज्य भाग बनल्या आहेत. आता हा सात हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार आहे."


ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या या वृत्तानुसार चीनने म्हटलं आहे की, "भारतातील काही अतिराष्ट्रवादी पक्ष सातत्याने चीनला बदनाम करण्याचा कट आखत असतात. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम पहिल्यांदाच घडलेली नाही. पण आम्ही भारताला समजावू इच्छितो की याचा काहीच उपयोग होणार नाही आणि हे शक्य देखील नाही."


या लेखात सोनम वांगचूक यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडीओद्वारे सोमन वांगचूक यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करत 'बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स' ही मोहीम सुरु केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर तसंच रिमूव्ह चायनीज अॅप या अॅपवरही चीनने आक्षेप नोंदवला आहे. चीनच्या तक्रारीनंतर गुगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप हटवण्यात आलं. अँड्रॉईड फोनमधून चिनी अॅप शोधण्याचं काम हे अॅप करत होतं.





"भारत आणि चीन सीमा वाद ही नवी गोष्ट नाही. तसंच हा एवढाही तणाव गंभीर नाही जेवढी भारतात यावर काही विचारधारेचे लोक चर्चा करत आहेत. दोन्ही देश सातत्याने यावर चर्चा करत असून भारत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. परंतु काही भारतीय माध्यमं आणि काही भारतीय चुकीची माहिती आणि अफवा पसरवून चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटलं आहे.


"कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आधीच दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर बोजा आहे. अशात चिनी वस्तूंचा विरोध करुन भारतातील मध्यमवर्गीयांवरील ओझं आणखी वाढणारच आहे. कारण परवडणाऱ्या बहुतांश वस्तू भारत चीनमधूनच आयात करतो," असं चीनचं म्हणणं आहे.


चिनी इन्स्टिट्यूट ऑफ कन्टेम्पररी इंटरनॅशनल रिलेशनच्या साऊथ एशियन इन्स्टिट्यूटचे डेप्युटी डायरेक्टर लोऊ चुन्हाऊ यांच्या मते, "सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणं भारतीयांसाठी शक्यच नाही." ते म्हणाले की, "मोदी सरकारला भारताची पायाभूत सुविधा पुन्हा एकदा उभी करायची आहे आणि चिनी वस्तूंचा बहिष्कार करुन हे शक्य नाही."


दरम्यान भारतीय स्मार्टफोन मार्केटचा 72 टक्के भाग चिनी कंपन्यांच्या ताब्यात आहे. टीव्ही मार्केटच्या बाबतीत 45 टक्के तर दैनंदिन वस्तूंच्या बाबतीत ही भागीदारी 70 ते 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.


संबंधित बातम्या




 

Majha Katta बुलेटनी नाही तर वॉलेटनी चीनला चोख उत्तर! सोनम वांगचुक यांच्याशी खास बातचीत | माझा कट्टा