मुंबई: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत आज मालवली. ते 93 वर्षांचे होते. वाजपेयींच्या निधनाने जगभरातील नेत्यांनीही श्रद्धांजली व्यक्त केली. भारताच्या शेजारील शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या आघाडी दैनिक ‘डॉन’ने वाजपेयींच्या निधनाचं वृत्त छापलं आहे.


भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा गुरुवारी वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू, नरेंद्र मोदींकडून ट्विटरवर दुजोरा” या मथळ्याखाली डॉन दैनिकाने वेबसाईटवर वृत्त छापलं आहे.

वाजपेयींची पार्श्वभूमी देताना डॉन दैनिकाने 1998 मधील पोखरण अणू चाचणीचा उल्लेख केला आहे. वाजपेयींनी 1998 मधील पोखरण अणूचाचणीमुळे पाकिस्तानसोबत आण्विक युद्धाची स्थिती निर्माण केली होती. मात्र नंतर त्यांनी इस्लामाबाद शांतता करार केला, असं डॉनने म्हटलं आहे.

वाजपेयी हे तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले हिंदुत्ववादी होते. वाजपेयी कुशल राजकारणी म्हणून कार्यकर्त्यांमध्ये परिचीत होते, असं डॉनने नमूद केलं.

वाजपेयी आणि त्यांच्या पक्षाने देशातील मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, अशी त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे भारतात दुर्मिळ आहे, असं डॉनने म्हटलं आहे.

पोखरण चाचणी

11 मे 1998 रोजी तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने राजस्थानातील पोखरणमध्ये अणू चाचणी केली होती. या चाचणीमुळे अख्खं जग हैराण झालं होतं. अचानाक झालेल्या या चाचणीमुळे अमेरिका, पाकिस्तानसह संपूर्ण जगाला धक्का बसला होता.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वात हे मिशन फते केलं होतं. तेव्हा कलाम राष्ट्रपती नव्हते. अमेरिकेलाच काय, संपूर्ण जगाला याचा पत्ता लागला नव्हता.

या संपूर्ण मिशनवर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA लक्ष ठेवून होती. मात्र कोणालाही शास्त्रज्ञांचा पत्ता लागू नये, म्हणून त्यांना आर्मीच्या वर्दीत पोखरणला नेण्यात आलं होतं. अब्दुल कलामही आर्मीच्या वर्दीतच तिथे उपस्थित होते.

कारगिल युद्ध

कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी कारगिल युद्ध पुकारलं होतं. जवळपास अडीच महिने चाललेल्या या युद्धात भारताने 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये तिरंगा फडकवला.

जवळपास 18 हजार फूट उंचीवर कारगिलमध्ये हे युद्ध झालं होतं. या युद्धात भारताचे जवळपास 527 जवान शहीद झाले तर 1300 पेक्षा जास्त जवान जखमी झाले होते.

या युद्धावेळी भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जवानांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं होतं. या युद्धाच्या निमित्ताने वाजपेयींच्या कूटनितीचा प्रत्यय जगाला आला होता.

युद्धादरम्यान वाजपेयींनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही खडे बोल सुनावले होते. एकीकडे तुम्ही मला लाहोरला बोलावून स्वागत करता आणि दुसरीकडे युद्ध छेडता, हे खूपच वाईट आहे, असं वाजपेयी म्हणाले होते.

जोपर्यंत पाकिस्तान कारगिल सोडत नाहीत, तोपर्यंत बातचीत होणार नाही. त्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहोत, असंही वाजपेयी म्हणाले होते.

14 जुलै 1999 रोजी ऑपरेशन विजयची घोषणा केली होती. तर 26 जुलै 1999 हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं.

अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते.

वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं.  जिंदादिल राजकारणी,  हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.

संबंधित बातम्या

मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला

राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन  


अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी  

वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी 

हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार  

मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी