Flood : सध्या जगातील अनेक देशांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं काही देशांमध्ये पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच या पुरामुळं अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या जगातील अमेरिका, इटली, पाकिस्तान तसेच भारतातीत काही राज्यात पुरानं (Flood) थैमान घातलं आहे. या पावसामुळं लाखो लोक बेघर झाले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरु आहे. पाहुयात कोणत्या देशात नेमकी काय स्थिती...


देशातील अनेक देश सध्या पुराचा सामना करत आहे. पुरामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं परिस्थिती इतकी बिघडली आहे की, अनेक ठिकाणी लोकांना अन्न देखील मिळत नाही. या भागात मदतकार्य सुरु आहे. पुरामुळ वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.


पाहुयात कोणत्या देशात काय स्थिती


इटली


इटलीमध्ये आलेल्या महापुरात 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी, इटलीच्या मार्चे भागात, जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूला पाणी दिसत होते. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्यांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. त्याचवेळी पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक पुरापासून बचावाचा प्रयत्न करत आहे. आपत्तीमुळं विस्थापित झालेल्या लोकांसाठी तात्पुरती घरे उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य दिले जाईल. तसेच पुरामुळं झालेल्या नुकसानाची दुरुस्ती केली जाईल, असे मत राष्ट्राध्यक्ष सर्जियो मॅटारेला आणि पंतप्रधान मारियो द्राघी यांनी केलं. सहा महिन्यांत जेवढा पाऊस पडला तेवढा पाऊस दोन-तीन तासांत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 




अमेरिका


अमेरिकेतील अनेक शहरामध्ये पुरानं थैमान घातलं आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या अनेक भागात पुराच्या पाण्यानं कहर केला आहे. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अमेरिकेच्या या भागातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. घराबाहेर पाणी साचले आहे. लोकांना घरे सोडता येत नसल्यामुळे त्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.




पाकिस्तान


गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात पुरामुळं परिस्थिती बिकट झाली आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जवळपास साडेतीन कोटीहून अधिक नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. तर या पुरामुळं पाकिस्तानात आतापर्यंत 1 हजार 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3 कोटी 30 लाख लोक बेघर झाले आहेत. पाकिस्तानातील सिंध प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.




भारत


भारतातील अनेक राज्यांमध्ये पूरसदृश स्थितीही दिसून आली आहे. झारखंडपासून मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेशपर्यंत हजारो लोकांना पुराचा फटका बसला आहे. राजस्थानमध्ये 200, तर मध्य प्रदेशात 60 हून अधिक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. रहिवासी भागात पाणी शिरल्याने शेकडो लोक बेघर झाले आहेत. त्याचबरोबर बचावकार्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.