नवी दिल्लीः  हिमपर्वत दिसायला जेवढे आकर्षक दिसतात, ते तेवढेच जिवघेणे सुद्धा आहेत. गिर्यारोहक आपल्या जिवाची बाजी लावून एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न पाहतात. अनेक जण हे स्वप्न पूर्ण करतात, तर काही जण दुर्दैवाने कायमचे या एव्हरेस्टच्या कुशीत सामावले जातात.


 

महाराष्ट्राच्या सुपुत्रानेही यावर्षी एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळवला आहे. पोलिस दलातील औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस कर्मचारी रफिक शेख यांनी 20 मे रोजी एव्हरेस्ट चढाई केली.

 

30 हजार फुट उंचीवर असणाऱ्या माऊट एव्हरेस्टवर जीवन आणि मृत्यू यांच्यात केवळ एकाच पाऊलाचं अंतर असतं, एक पाऊलही चुकला तर जिवाला मुकावं लागतं.

 

मृतदेहच बनलेत लँडमार्क

एव्हरेस्ट चढताना 1924 पासून आतापर्यंत एकूण 248 गिर्यारोहकांनी आपले प्राण गमावले आहेत. 2014 मध्येही हिमवादळामुळे 16 गिर्यारोहकांना आपला जीव गमवावा लागला होता. सोबतच 2015 साली आलेल्या हिमवादळानेही अनेक गिर्यारोहकांचे प्राण घेतले होते.

माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या 200 जणांनी आतापर्यंत एव्हरेस्ट चढाई करताना जीव गमावला आहे. हे मृतदेह स्मशानभूमीच्या स्वरुपात रस्त्यावर पडलेले असतात. या मृतदेहांचा वापर रस्ता ओळखण्यासाठी लँडमार्क म्हणून केला जातो.

 

मृतदेह काढणं म्हणजे आत्महत्या

एव्हरेस्ट चढताना प्राण गमावलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह एका ठराविक उंचीपर्यंत काढले जातात. मात्र, त्या उंचीनंतर मृतदेह खाली आणणे म्हणजे आत्महत्या समजली जाते. त्यामुळे 2013 पर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह तसेच एव्हरेस्टच्या कुशीत सामावले आहेत.

 

 

संबंधित बातम्याः

पोलीस हवालदार रफिक शेखची 'एव्हरेस्ट'ला गवसणी


‘एव्हरेस्ट’वीर पोलीस हवालदार रफिक शेख यांच्या पायाला हिमदंश