Washim News : घरकुल (Gharkul) योजनेमुळे अनेकांना त्यांच्या स्वप्नातील घर साकार करण्याची संधी मिळते. त्यामुळे केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना किंवा शबरी आवास योजना राबवण्यात येते. या योजनेमुळे गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होते. पण वाशिममध्ये (Washim) या घरकुल योजनेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचं चित्र सध्या आहे. वाशिममधील राजाकीन्ही  इथे एका  दाम्पत्याला  दोन घरकुल योजना समोर आलं आहे. पण  ग्रामपंचायतीने देखील या दाम्पत्याला योजना देताना ही बाब कशी लक्षात आली नाही असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. 


नियमांचा पायमल्ली


ज्यांचे घर कुडाचे किंवा मातीचे आहे ,जे लोक बेघर आहेत अशा लोकांना स्वत:चं हक्काचं असं पक्क घर शासनाच्या  पंतप्रधान आवास योजनेमधूल घरकुलाच्या माध्यमातून मिळते. पण प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला एकाच रेशनकार्डाच्या आधारावर हा लाभ देण्यात येतो. हा या योजनेचा सर्वसाधरण नियम आहे.पण वाशिममध्ये या नियमाची अक्षरश: पायमल्ली झाल्याचं चित्र सध्या आहे. यामधील पती दीपक लोखंडे आणि पत्नी गीता लोखंडे या दाम्पत्याला दोन घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना त्यांच्या घरासाठी दोघांच्या नावाने पहिला हफ्ता देखील मिळाला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या घरकुलाचे बांधकाम देखील सुरु केले आहे. 


ग्रामपंचायतीवर कारवाई होणार? 


पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतील ठरावात लाभार्थ्यांची निवड करता येते. तसेच यामध्ये अनुसूचित जमाती, अपंग, विधवा,परितक्त्या आणि निराधार या क्रमाने प्राधान्य दिले जाते. मात्र ग्रामपंचायतीने हे सर्व नियम बाजूला सारत या दाम्पत्याला हा लाभ दिला आहे. या प्रकरणाबाबत गंभीर दखल घेऊन नागरिकांनी पंचायत समितीकडे तक्रार देखील केली. पण या तक्रारी कोणाही गांभीर्याने घेत नसल्याचा दावा गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्या या ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या ग्रामपंचायतीवर कारवाई होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक नियमांची आखणी करण्यात आली आहे. यानुसार, या योजनेचा लाभ एक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला देण्यात येतो. तसेच एका बँक खात्याच्या माहितीवर एकच घर उपलब्ध होणे असे नियम घरकुल योजनेसाठी तयार करण्यात आले आहे. पण जिल्ह्यातील राजाकीन्ही या गावातील या प्रकारामुळे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांवर देखील कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.