वर्धा : शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचे (school nutrition) शोषण करणारा काळा बाजार वर्ध्यात (Wardha) उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्य चोरांच्या पोलिसांनी  मुसक्या आवळल्यात. दरम्यान या टोळीला सेवाग्राम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शालेय पोषण आहारातील या गैर प्रकाराने वर्ध्यात खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणात व्यापाऱ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलिसांनी वाहनांसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. 


या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण 8 लाख 69 हजार 810 रुपयांचा धान्यसाठा देखील पोलिसांनी जप्त केलाय. किशोर नारायण तापडीया रा. एसटी डेपोजवळ, रामनगर, विनोद बबन भांगे रा. बोरगांव(मेघे), शेख रहीम शेख करीम रा. स्वस्तिक नगर, सावंगी(मेघे), अंकीत सतिश अग्रवाल रा. मुर्तिजापूर, अकोला  यांच्यासह इतरांवर कारवाई करण्यात आलीये. या घटनेमुळे संपूर्ण वर्ध्यात एकच खळबळ माजली. 


पोलिसांची कारवाई


सेवाग्राम पोलिसांनी  वाहनचालक विनोद भांगे यास वाहनासह ताब्यात घेतले.यावेळी त्याच्या वाहनात अवैधरीत्या 25 क्विंटल तांदूळ आढळून आलेत. त्याला पोलिसांनी आपला इंगा दाखवताच त्याने हा तांदूळ एमआयडीसी परिसरातील किशोर तापडीया यांच्या गोडाऊनमधून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच सदर तांदूळ सांवगी(मेघे) येथील धान्य तस्कर शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. किशोर तापडीया हा जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करीत असल्याची माहिती यावरून समोर आलीय. याबाबत शिक्षण विभाग हा अनभिज्ञ होता काय? असाच प्रश्न उपस्थित होतोय.


विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार


शाळकरी विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात पोषण मिळावे यासाठी सरकारकडून शालेय पोषण आहाराची तरतूद करण्यात आलीये. पण याच पोषण आहारात आता काळाबाजार होत असल्याने अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याच पोषणा आहाराचा काळाबाजार होत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणात आता पोलीस कोणती कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. तसेच यामध्ये आणखी कोणाची नावं पुढे येणार हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Thane Crime : 80 किमी अंतराचे सीसीटीव्ही तपासले, खबऱ्यांचे नेटवर्क वापरले, महिलांचे दागिने चोरणाऱ्या इराणी टोळीतील चोरांना अखेर बेड्या