सोलापूर : सलग दोन वर्षांच्या भीषण दुष्काळानंतर तुडुंब भरलेलं उजनी धरण वजा पातळीत गेलं आहे. केवळ सहा महिन्यातच जवळपास 59 टीएमसी पाण्याचा वापर झाल्याने आता पावसाळ्यापर्यंत टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.


गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने आणि उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली. मात्र यंदा पाण्याचं नियोजन कोलमडल्याने 28 एप्रिललाच धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यांवर गेली.

उजनी धारण 117 टीएमसी क्षमतेचं आहे. या धरणाच्या जिवंत साठ्यात 53. 57 टीएमसी, तर मृत साठ्यात 63.65 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे.

प्रशासनाने फ्लॅपची उंची वाढवून पाणी क्षमता 123 टीएमसीपर्यंत वाढवली असली तरी यंदा नियोजनाचेच तीन तेरा वाजल्याने धरण वजा पातळीत पोहोचलं आहे.

सोलापूर शहराला 2 टीएमसीची गरज, 20-22 टीएमसी पाणी वाया

एकट्या सोलापूर शहरासाठी दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र साठवणूक क्षमता आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने एकट्या सोलापूर शहरासाठी 20 ते 22 टीएमसी पाणी वाया जातं.

सोलापूर शहरासाठी नदीद्वारे पाणी सोडावं लागतं. वर्षभरातून चार ते पाच वेळा हे पाणी सोडलं जातं. मात्र नदीतून पाणी सोडताना पाण्याची मोठी नासाडी होते. ही नदी कर्नाटक राज्यातून जाते. त्यामुळे तेथील शेतकरीही या पाण्याचा फायदा घेतात. परिणामी सोलापूरपर्यंत हक्काचं पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही.

पाईपलाईनसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीकडेही पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी थर्मल पॉवर स्टेशनची पाईपलाईन महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची सूचना केली, ज्यातून शहराला पाणी पुरवठा केला जाईल.

सोलापूर महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने अद्याप हा प्रश्न प्रलंबित आहे. सोलापूर थर्मल पॉवर स्टेशन आपली तयार असलेली पाईप लाईन देण्यास तयार आहे. त्याबदल्यात महापालिकेला केवळ शहराचं वापरल्यानंतर वाया जाणारं पाणी (Waste water) थर्मल स्टेशनला द्यायचं आहे.

मात्र महापालिकेच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी वाया जात आहे. पाईपलाईनचा पाणी प्रश्न मार्गी लागल्यास सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या :  उजनी धरण काठोकाठ, 7 दरवाजांमधून विसर्ग सुरु