Shivaji Park, Mumbai : अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. त्यासाठी राम भक्तांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या उद्घाटन समारंभाला जाणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आज त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. "बाबरी पाडल्यानंतर 25 ते 30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होत आहे. त्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला. आम्ही 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचासुद्धा आहे, असे त्यांनी सांगितले होते." असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. 


नाशकात गोदावरी नदीच्या तीरावर महाआरती होणार (Uddhav Thackeray)


उद्धव ठाकरे म्हणाले, आज 6 जानेवारी माँ ची जयंती आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी आम्ही अभिवादन करण्यासाठी येत असतो. आजही आम्ही अभिवादन केलं. 23 जानेवारीला हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचे शिबीर होणार आहे. त्याच दिवशी रात्री अनंत कानेरे मैदान गोल्फक्लब येथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्यादिवशी नाशकात गोदावरी नदीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. 


राम मंदिराच्या उद्घाटला राजकीय रंग येऊ नये : उद्धव ठाकरे 


अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहला धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग येऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो, असेही ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नमूद केले. 


प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण


अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अयोध्येमध्ये रेल्वे स्थानक आणि विमानतळाचं ही उद्घाटन करण्यात आलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत निमंत्रित आहे, ते जाणून घ्या.


महाराष्ट्रातून एकूण निमंत्रितांची संख्या : 889


महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित व्यक्ती : 534
कोकण - 397 जण
पश्चिम महाराष्ट्र - 84 जण
मराठवाडा (देवगिरी) - 17 जण
विदर्भ - 36 जण


महाराष्ट्रातून निमंत्रित साधू संत - 355


कोकण - 74
पश्चिम महाराष्ट्र -124
मराठवाडा (देवगिरी) - 80
विदर्भ - 77


साडेतीनशे VVIP ना निमंत्रण


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही. त्याशिवाय शरद पवार यांना अजूनही निमंत्रण पोहचलेले नाही. लवकरच या सर्वांना निमंत्रण पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Ayodhya Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांना अद्याप निमंत्रण नाहीच, महाराष्ट्रातून 889 जणांना बोलावणं; अयोध्येत कोण-कोण जाणार?