मुंबई : अनेकदा आपल्या हाती अधिकार आले तर तो अधिकारी वा राजकारणी व्यक्ती सर्वसामान्य लोकांना तुच्छ समजून त्याची लायकी काढतात, त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याची संधीही सोडत नाही. मध्य प्रदेशमधील अशाच एका कलेक्टरने एका ड्रायव्हरला त्याची लायकी विचारली आणि अपमानित केलं. पण हे कृत्य त्या कलेक्टरला चांगलंच महागात पडल्यांच दिसून आलं. शाजापूरचे कलेक्टर किशोर कन्याल (IAS Kishor Kanyal) यांना 24 तासांमध्ये पदावरून हटवण्यात आलं आहे. 


मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये ड्रायव्हरची लायकी विचारणाऱ्या कलेक्टर किशोर कन्याल यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची स्वत: मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव (MP CM Mohan Yadav) यांनी दखल घेत त्यांना पदावरून हटवले. त्यांना पदावरून हटवण्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः गरिबांचे पुत्र असून हे सरकार गरिबांचे असल्याचे सांगितले. या सरकारमध्ये सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. यासोबतच त्यांनी राज्यातील उर्वरित अधिकाऱ्यांनाही त्यांच्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


आंदोलन करणाऱ्या ट्रक चालकाला खडसावलं


किशोर कन्याल यांना पदावरून हटवल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने रिजू बाफना यांना शाजापूरचे जिल्हाधिकारी बनवले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपादरम्यान जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी शाजापूरमध्ये एका ट्रक चालकाला खडसावले होते. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिल्हाधिकारी किशोर कन्याल ड्रायव्हरशी गैरवर्तन करताना दिसत होते. ते थेट ड्रायव्हरला तुमची लायकी काय असं विचारताना दिसत आहेत. तर ट्रकचालक आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ संप आणि आंदोलनावर ठाम होते.






 


संपाच्या शेवटी कारवाई


आता केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर वाहतूकदारांचा संप मिटला आहे. देशभरातील रस्त्यांवर पुन्हा ट्रकची चाके धावू लागली आहेत, मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या या गलथान कारभाराचा प्रकार थांबताना दिसत नाही. प्रकरण वाढल्यावर खुद्द मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांना कारवाई करावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांना पदावरून हटवताना ते म्हणाले की, हे सरकार गरिबांचे असून पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर चालत आहे. यामध्ये सर्वांचे प्रयत्न आणि प्रत्येकाचा विकास सामील आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितली होती


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि सरकारने दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनीही स्पष्टीकरण दिले. याबद्दल त्यांनी माफी मागितली होती. त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रकचालकांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान ही व्यक्ती कोणत्याही थराला जाण्याचे वारंवार सांगत होती. त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी तो जरा कडक शब्दात बोलले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.


 






ही बातमी वाचा :