Tanaji Sawant : ठाणे पालिका रुग्णालयात (Thane Palika Hospital) एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हे प्रकरण नेमकं कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. याबाबत चौकशी समिती तयार करण्यात अली असून, अहवाल मागवला आहे. अहवाल येताच नक्की कारवाई होईल असेही सावंत म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री गिरीश महाजन हे दोघे ही यावर लक्ष ठेऊन असल्याचे सावंत म्हणाले.  


मी सातत्याने या घटनेची माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत असल्याचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येते. तरी सुद्धा मृत्यू हा मृत्यू आहे. नेमकी कशामुळे ही घटना घडली याचा अहवाल एक ते दोन दिवसात येईल असे सावंत म्हणाले. दरम्यान, मृत्यू झालेले 13 रुग्ण हे आय सी यू मध्ये तर 4 रुग्ण हे जनरल वार्डमधील आहेत. याबाबत रुग्णालयाच्या डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल असेही सावंत म्हणाले.


दोषींवर कठोर कारवाई केली जाणार


ठाणे रुग्णालयाच्या घटनेबाबत दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सावंत म्हणाले. सध्या सुरु असलेल्या डोळ्याच्या साथीवर देखील सावंत यांनी प्रतिक्रिया दिली.  याबाबत आमच्याकडून पूर्ण तयारी झाली आहे. पथके तयार करुन यासंदर्भात मोहीम राबवली जात असल्याचे सावंत म्हणाले. जवळपास 1 हजार 600 ते 1 हजार 700 नवीन डॉक्टरची भरती एम पी एस सी आयोगाला दिली असल्याचे सावंत म्हणाले. आम्ही पावसाळी अधिवेशनात मोफत उपचाराची घोषणा केली असल्याचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले.


नेमकं काय घडलं ? 


ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांनी आयुष्य गमावले. मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. 


रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


धक्कादायक! ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू