ठाणे : डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटात (Dombivli MIDC Blast) 12 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही 9 जण अजूनही बेपत्ता असल्याची महिती आहे. मात्र घटनास्थळी जवळपास 25 ते 30 मानवी अवशेष मिळाले आहेत. त्याची अजून डीएनए तपासणी झाली नाही. त्यामुळे बेपत्ता असलेल्यापैकी किती जण मृत आहेत याचा अधिकृत आकडा जरी समोर आला नसला तरी मृतांची संख्या मात्र मोठी आहे हे स्पष्ट झालंय.


डोंबिवली एमआयडीसीमधील केमिकल कंपनीममध्ये ब्लास्ट झाल्यानंतर त्यामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकजण जखमी झाले आहेत. मात्र अद्याप 9 जण बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. 


मृतांच्या संख्येत मोठी वाढ होणार


डोंबिवली एमआयडीसी ब्लास्टच्या ठिकाणी आतापर्यंत 25 ते 30 मानवी अवशेष सापडले आहेत. त्यांची डीएनए चाचणी करून ओळख पटवण्यात येणार आहे. त्यामुळे बेपत्ता असलेले नागरिक मृत झाले आहेत का याबद्दल अपडेट येऊ शकेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवी अवशेष सापडल्याने मृतांच्या संख्येत मात्र मोठी वाढ होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. 


पुन्हा स्फोट होण्याची शक्यता


डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाला आज नऊ दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही कंपनीतून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. अशातच कंपनीच्या खाली केमिकलच्या ड्रम्सचा साठा असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे. तर केमिकलच्या साठ्यामुळे कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं समोर येतंय.


बेपत्ता कामगाारांना कोणतीही मदत मिळणार नाही


डोंबिवली स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. मात्र जे कामगार अद्याप बेपत्ता आहेत त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. जर शासनाने विशेष बाब म्हणून परिपत्रक काढलं तर बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत मिळू शकते. अन्यथा बेपत्ता झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सात वर्ष मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


ही बातमी वाचा :