ठाणे : डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणात (Dombivli MIDC Blast) कंपनीच्या मालकाला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करायचा असून आरोपीला सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर ही नैसर्गिक घटना असून तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगत पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.


डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरण 


अमुदान या कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन 12 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांना यामध्ये दुखापत झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात 304 ए कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. 


या प्रकरणाचा तपास उल्हासनगर गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून फक्त शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले. 


मलय मेहता यांना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेला 29 मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली होती. आज मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. 


कल्याण न्यायालयाच्या सर न्यायाधीश श्रीमती   एस एस राऊळ यांच्या दालनात आरोपीचे वकील सम्राट ठक्कर आणि सरकारी वकील पी. सकपाळ यांच्यात युक्तिवाद झाला. यावेळी तपास पूर्ण करणे, मृतदेहांची ओळख पटवणे, रिअॅक्टर नेमका कुठून आणला आहे याची माहिती मिळवणे या अशा अनेक बाबींचा तपास करण्यासाठी सरकारी वकिंलाकडून आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. तर सम्राट ठक्कर यांनी राजस्थान न्यायालयाने औद्योगिक विभागात जर असा अपघात घडला तर त्याला 304 ए कलम लागू होत नसल्याचे सांगितले होते. हाच धागा पकडून  कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारण्याचा किंवा त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता असे आरोपीचे वकील सम्राट ठक्कर यांनी सांगितले.  


ही नैसर्गिक घटना असून, तांत्रिक चुकीमुळे नाही तर उष्णता वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगत त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद केला. तर कंपनीच्या को डायरेक्टर असलेल्या स्नेहा मेहता यांचा कंपनीशी डायरेक्ट काही संबंध नाही. त्यांची सही देखील कंपनीमध्ये चालत नाही. त्या कॉमर्स बॅकग्राऊंडच्या असल्याने केमिकल संदर्भात त्यांना माहित नाही. त्यांची आजारी सासू आणि त्यांची दोन मुले त्यांची वाट बघत असल्याचा युक्तिवाद देखील सम्राट ठक्कर यांनी केला.


ही बातमी वाचा: