ठाणे: एकीकडे राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात  हिंसक आंदोलने सुरु असतानाच, भिवंडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar)  कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका (Bhiwandi Malodi Toll Plaza) फोडल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे अंजुरफाटा ते चिंचोटी रस्त्यावर प्रचंड खड्डे असून हे खड्डे बुजवल्यानंतर  टोल वसुली करावी असे  वारंवार सांगून देखील टोल वसुली सुरू होता. त्यामुळे हा टोलनाका फोडण्यात आला. 


खारबाव गावचे माजी सरपंच महेंद्र पाटील आणि पाये गावचे उपसरपंच प्रशांत म्हात्रे यांनी हातात बॅट घेऊन मालोडी टोलनाका फोडला. रस्ते दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा सांगूनही रस्ते दुरुस्त होत नसल्याने मालोडी टोलनाका फोडला असल्याचे सांगण्यात आले. तसेच जोपर्यंत रस्ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू करण्यात येऊ नये अशी मागणीही यावेळी  करण्यात आली आहे


यापूर्वीही मालोडी टोल नाक्याची तोडफोड 


ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः  चाळण झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही 20  ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यातील वसई मार्गावरील खारबाव कामण रस्त्यावरील मालोडी टोल नाक्याची तोडफोड मनसे कार्यकर्त्यानी केली होती. त्यांनतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्ती करून तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही खड्डे जैसे थे असल्याने 1 सप्टेंबर रोजी  टोल कशेळी नाक्यावरच  मनसेने  प्रशासनाचं  श्राद्ध घातलं होतं आणि अधिकाऱ्याविरोधात  मुंडन आंदोलन करून  टोल केला बंद केला होता.


इशारा आंदोलन करूनही टोलवसुली सुरूच 


भिवंडी मार्ग  बीओटी तत्वावर तयार करण्यात येऊन या मार्गवरील कशेळी गावाच्या हद्दीत टोल नाका उभारून याठिकाणी वसुली सुरू केली. मात्र रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. अंजुर फाटा ते कशेळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात  खड्डे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागतो आहे.


अनेकांना मानेचा ,कमरेचा ,पाठीचा, आजाराला देखील समोरे जावे लागत आहे अनेक अपघात घडून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोलवसुली का केले जाते असा सवाल वाहनचालकांकडून  करण्यात आला.


ही बातमी वाचा: