अकोला : अकोल्यातील शेतकऱ्याच्या हातात सध्या स्मार्टफोन दिसतो. शेतीचे सगळे प्रश्न स्मार्ट पद्धतीनं इथे सुटत आहेत. शेतकऱ्याचं ‘वावर’ संपन्न करण्यासाठी मुर्तीजापूर तालुक्यातील अमोल खंडारे या युवा अभियंत्यानं वावर अॅपची निर्मिती केली आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीही त्याला पाठबळ दिलं.


अमोलचे काका एक उत्तम शेतकरी होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. काकांच्या आत्महत्येची वेदना अमोलला शेतकरी प्रश्नांकडं घेऊन आली. मध्यस्थांच्या साखळीने बाजारात शेतकऱ्याची होणारी कुचंबना पाहिली. बेभवशाच्या बाजारावर मात करण्यासाठी त्याने थेट शेतकऱ्यांना ग्राहकांशी जोडण्याचं ठरवलं. रेल्वेत अभियंता पदावर काम करत असतानाही वेळ काढून त्यानं वावर अॅप तयार केलं. रब्बीतील पिकं बाजारात आल्यावर शेतकरी-ग्राहकांना या अॅपचा वापर होणार आहे.

VIDEO : थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीसाठी 'वावर' अॅप


अकोल्यात दरवर्षी थेट शेतकरी ते ग्राहक कृषी प्रदर्शन भरतं. जिथं हजारो क्विंटल धान्य आणि शेतमालाची विक्री होते. मात्र इथे आलेले अनेक ग्राहक वर्षभर थेट शेतकऱ्याकडून शेतमाल मिळावा असा आग्रह धरतात. हेच पाहून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हे अॅप लोकांपर्यंत पोहचवण्याचं ठरवलं. आणि याचं लोकार्पण झालं. गुगल प्ले स्टोवर हे अॅप शेतकरी-ग्राहकाला मिळणार आहे.

शेतकरी या अॅपवर आपल्या शेतमालाची मोफत जाहिरात करतील. त्यावर शेतमालाचे फोटो, त्याचा दर  आणि संपर्क क्रमांक टाकतील. ज्या ग्राहकांना शेतमाल हवा आहे ते शेतकऱ्यांशी संपर्क करतील आणि शेतमालाची खरेदी होईल. याचा सर्वाधिक फायदा फलोत्पादक शेतकऱ्याला होणार आहे.

इथं प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार आहे. याशिवाय शेतीविषयक विविध योजना, किड-रोग आणि त्यावरील उपचारपद्धती, सोबत बेरोजगार तरुणांसाठी नोकरीचं पोर्टलही इथं असणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानानं शेतकऱ्याचं जीवन सुखी होऊ शकतं. मात्र हे तंत्रज्ञान शेतकऱ्याचा बांधावर पोहचतच नाही. हेच तंत्रज्ञान पोहचवण्याचा अमोलचा प्रयत्न आहेत. बाजाराला खुलं करण्याकडं एक पाऊल आहे. ज्याचा फायदा बळीराजाच्या उन्नतीसाठी होणार आहे.

VIDEO : शेतकरी-ग्राहकांना जोडणारं वावर अॅप कसं वापरायचं?