मुंबई : डिजिटल बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि कॅशलेसकडे वाटचाल करत असलेल्या भारताला चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. भारतामध्ये 15 ते 65 या वयोगटातील केवळ 19 टक्के लोक इंटरनेट वापरतात, तर या वयोगटातील 35 टक्के लोकांना इंटरनेटबद्दल माहिती आहे, असं एका सर्वेक्षणात म्हटलं आहे.


"AfterAccess: ICT access and use in India and the Global South" या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती नोंदवण्यात आली आहे. लर्नेशिया या भारतीय दूरसंचार कंपन्यांसोबत मिळून धोरण आणि नियामक म्हणून काम करणाऱ्या लर्नेशिया या थिंक टँकने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

भारतात अजून इंटरनेटविषयी म्हणावी तशी जागृती झालेली नाही. 15 ते 65 या वयोगटातील केवळ 35 टक्के लोकांना हे माहिती आहे, की इंटरनेट म्हणजे काय आहे. विशेष म्हणजे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या यापेक्षाही कमी म्हणजे 19 टक्क्यांच्या आसपास आहे, असं अहवालात म्हटलंय.

भारत फक्त 20 टक्के प्रौढ नागरिकांनी जोडलेला आहे. ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक परवडणारी इंटरनेट सेवा देणाऱ्या देशांमध्ये भारताचा अव्वल क्रमांक लागतो, अशी खंत लर्नेशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेलानी गलपाया यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, इंटरनेट वापरणारांमध्ये सर्वाधिक युझर्स 15 ते 65 या वयोगटातील आहेत, ज्यापैकी 27 टक्के लोक सोशल मीडियावर वेळ घालवतात, असंही अहवालात म्हटलंय.