मुंबई : कोरोनामुळे लागलेल्या या लॉकडाऊनमध्ये आपण वर्क फ्रॉम होम करतोय, अगदी सहजरित्या आपण डेस्कटॉप कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स वापरतो. सध्याचं जग हे तंत्रज्ञानावर चालणारं जग म्हणून मानलं जातं, मात्र भारतातील या विकासामागे अनेकांचे हात आहेत. भारतात ज्यावेळी संगणक क्रांती होणार होती त्यावेळी भारताने अमेरिकेकडे महासंगणकाची मागणी केली. पण त्यावेळी संगणक देताना अमेरिकेने भारतासाठी एक अट घातली, ती अट म्हणजे 'भारताला कोणत्याही प्रगत संशोधनासाठी त्या संगणकाचा वापर करता येणार नाही'.


त्यामुळे संगणक क्रांती हवी तर भारतालाच स्वत:च्या पायावर उभं राहावं लागणार हा एकच मार्ग उरला आणि या क्रांतीचे दिशादर्शक होते डॉ. संजय भटकर! एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते, त्यांनी अनेक रंगतदार किस्से, आव्हानं आणि अखेर मिळालेलं यश असा त्यांचा जीवनप्रवास माझाच्या या मुलाखतीत सांगितला.


संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली?


ज्यावेळी त्यांनी हे आव्हान स्वीकारलं त्यावेळी डॉ. भटकर यांना संगणकनिर्मितीचा काहीच अनुभव नव्हता. पण आपली बुद्धिमत्ता आणि ज्ञान वापरून भारताला आव्हान देणाऱ्या अमेरिकेपेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळात त्यांनी भारतीय बनावटीचा पहिला संगणक घडवला. संपूर्णपणे भारतात तयार झालेल्या या संगणकाला परम हे नाव दिलं गेलं. केवळ इतकंच नाही तर भारतासोबत इतर देशांनाही भारताने हे तंत्रज्ञान निर्यात केलं. 


गेल्या तीस वर्षात विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जी झेप घेतली त्या प्रत्येक भरारीला डॉ. विजय भटकर यांनी बळ दिलं. संगणकीय भाषेत केवळ 0 आणि 1 हेच अंक असतात, तरीसुद्धा आज भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा सहजरित्या आपण टाईप करू शकतो, याचं श्रेयही डॉ.भटकर यांनाच जातं.


परम घडवण्यासोबतच सी-डॅक (Centre for Development of Advanced Computing) च्या माध्यमातून सर्व भारतीय भाषा सहजरित्या वापरता येतील अशी संगणकीय बहुभाषिक पद्धत विकसित केली. केरळमधील इन्फोटेक पार्क असेल किंवा Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) ची उभारणी, अनेक मोठमोठ्या संस्थांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. संशोधक, लेखक, शिक्षणतज्ञ अशा अनेक भूमिका ते वर्षानुवर्ष बजावत आहेत.


संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा!



डॉ. भटकर यांचा बालपणापासून ते शास्त्रज्ञ असा अनोखा प्रवास!


अकोल्यातील मुरांबा या गावात त्यांचा जन्म झाला, राममंदिरात भरणाऱ्या शाळेत ते शिकायचे. प्राथमिक शिक्षणासाठीचे पहिले तीन वर्ग न बसता थेट चौथी इयत्तेत त्यांनी शिक्षण घेतलं, मोठ्या भावासोबत त्याच्याच इयत्तेत शिकण्याचा हट्ट धरणाऱ्या विजय यांनी परीक्षेत आपल्या गुणवत्तेनं शिक्षकांना थक्क केलं. आई आणि आजी शिक्षिका असल्याने त्यांना अभ्यासात त्यांना काही अडचणी आल्या नाहीत. पदवीचं शिक्षण घेत असताना दिल्लीमध्ये विजय यांनी पहिल्यांदा संगणक पाहिला, तोसुद्धा फोटोमध्ये.


तिरुवनंतपुरममध्ये रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट असताना राजीव गांधींशी विजय यांची अनेकदा भेट होत. राजीव गांधी इतर देशातून परतताना अनेक नवं तंत्रज्ञान असलेल्या वस्तू सोबत आणत. एकदा राजीव गांधींनी आपणही असा संगणक तयार करू शकतो का हा प्रश्न विचारला असता, विजय यांनी आत्मविश्वासाने होय असं उत्तर दिलं. आयुष्यात कधीही महासंगणक न पाहिलेल्या व्यक्तीसाठी संगणक तयार करणं हे मोठं आव्हान होतं. 


संगणक विकसित करण्यासाठी, त्यावर काम करण्यासाठी मोठा हॉल वापरला जायचा, भारताचा पहिला संगणक परम 8000 ची क्षमता एका सेकंदात एक अब्जपर्यंत गणिती होईल इतकी होती. संगणकाचा आाकरही मोठा असे, आता हेच तंत्रज्ञान आणखी काही पटीने विकसित होऊन आपल्या खिशात मावेल इतक्या लहान उपकरणांमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे, या विकासामागे भटकर यांचं मोठं श्रेय आहे. 


अध्यात्माची विज्ञानाशी सांगड


विज्ञान आणि अध्यात्म हे समीकरण डॉ. विजय यांनी जमवलं, त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, "महासंगणकाचा प्रकल्प सुरू असताना मी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. अनेक भाषांना प्रिटिंग मशीन, टाईप रायटर उपलब्ध नव्हते, साहित्यामागे जर तंत्रज्ञान नसेल तर त्या साहित्याची प्रगती होणार नाही असं मला वाटायचं. त्याचवेळी पुण्यातील साखरे महाराज ज्ञानेश्वरी घेऊन माझ्याकडे आले.  त्यांना ज्ञानेश्वरी दृकश्राव्य रुपात पाहायची होती, त्यासाठी ज्ञानेश्वरी समजणंही गरजेचं होतं. साखरे महाराजांनी केवळ ज्ञानेश्वरी दिलीच नाही तर ती पूर्णपणे समजावून सांगितली. तेव्हापासून मी अध्यात्माकडे वळलो."


भारतात तयार केलेला पहिला संगणक, कलर टीव्ही आणि सीसीटीव्ही!


महासंगणक तयार होण्यासाठी तीन वर्ष लागतील असा माझा अंदाज होता आणि तीन वर्षातच मी तो पूर्ण केला. यामध्ये विविध अडचणी आल्या, राजीव गांधींची हत्या झाल्याने डॉक्युमेंट्स मिळण्यासही वेळ लागला, त्यामुळे हा प्रकल्प काहीकाळ रखडला गेला. पहिले सहा महिने कुणाला पगारही नव्हता, देशातील विविध कोपऱ्यातून आलेली सर्वजणं अशा परिस्थितीतही कामावरच लक्ष केंद्रीत करत होते. याच अथक प्रयत्नातून अखेर संपूर्णपणे भारतीय बनावटीचा संगणक तयार झालं, असं त्यांनी सांगितलं.


आज आपण एचडी टीव्हीवर रंगीत चलचित्र पाहतो याची पार्श्वभूमी डॉ. विजय यांनी सांगितली. 1982 साली इंदिरा गांधींची मागणी होती की भारतात होणारे एशियन गेम्स टीव्हीवर कलर ब्रॉडकास्ट व्हावेत. लहानग्या झोपड्यांमध्ये त्या कलर टीव्हीचं मॅन्युफॅक्चरिंग होत होतं, यात स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. इंदिरांच्या मागणीनंतर कलर टीव्हीवर जोमाने काम सुरू झालं आणि अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं. केवळ संगणक आणि कलर टीव्हीच नाही तर आज ठिकठिकाणी लावल्या गेलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे मार्गदर्शनही डॉ. विजय भटकर यांनी केले. 


सुपर-कॉम्प्युटर काय आहे?


सध्या भारतात सुपर-कॉम्प्युटर तयार केला जात असल्याची त्यांनी माहिती दिली, हा सुपर कॉम्प्युटर अतिशय वेगवान असणार आहे, त्याची क्षमताही आतापर्यंतच्या सर्वात उत्तम तंत्रज्ञानाही लाजवेल अशी असेल. केवळ भारतच नाही तर अमेरिका, चीनही हा सुपर कॉम्प्युटर बनवत आहे. हा कॉम्प्युटर एक्झा स्केल असणार आहे म्हणजेच एकावर अठरा शून्य इतक्या संख्यांचं गणित करणारी क्षमता यात असणार आहे. डॉ. भटकर या प्रकल्पात मार्गदर्शन करत आहेत.


भारत टेक्नॉलॉजीसाठी मोठं बाजार मानलं जातं. भारतात मोबाईल, लॅपटॉप्स आणि इतर गॅटेट्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. तरीही भारतात इतर देशांच्या तुलनेने टेक गॅजेट्सचं कमी प्रॉडक्शन केलं जातं. डॉ. विजय भटकर यांच्यासारखे मोठे शास्त्रज्ञ महाराष्ट्राला लाभले, त्यांनी एका खेड्यातून येऊन भारतासह इतर देशांना शिकता येईल अशा तंत्रज्ञानाची निर्मिती केली, केवळ संगणकाच्या विकसिकरणावर ते थांबले नाहीत तर पुढे कलर टीव्ही, सीसीटीव्ही, अनेक मोठ्या संस्थांची उभारणी अशा अनेक प्रकल्पात ते सतत कार्यरत आहेत.


आजही सी-डॅकच्या माध्यमातून ते सुपर-कॉम्प्युटरवर काम करत आहेत. दिवसभर मोबाईल आणि कॉम्प्युटरसमोर केवळ मनोरंजन म्हणून बसणाऱ्या तरुणाईने त्यांचा आदर्श नक्कीच घ्यावा. त्यांच्या अथक श्रमांमुळेच आज या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत तुम्ही-आम्ही घरबसल्या जगातील दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकत आहोत, वर्क फ्रॉम होम करू शकत आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव मोठं करणाऱ्या मराठमोळ्या  डॉ.विजय भटकर यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे!