यंदा उजनी धरणाची स्थिती चिंताजनक बनली असताना शेतकऱ्यांची पिके जळू नयेत म्हणून रब्बी साथीचे दुसरे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनीतील पाणी पातळी येत्या काही दिवसात वजा पातळीत जाणार असल्याने पुन्हा कालव्यातून पाणी सोडणे अशक्य बनणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला  पाणी सोडण्याचे आदेश दिले. आज रात्री नऊ वाजल्यापासून उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब मोरे यांनी सांगितले. हे आवर्तन आज रात्री म्हणजे 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत सोडले जाणार आहे. 'ABP माझा'च्या बातमीनंतर पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरण प्रशासनाला दिले आहेत.


उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळाचे आमदार संजय शिंदे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.टी.धुमाळ, अधिक्षक अभियंता धीरज माळी यावेळी उपस्थित होते.


गतवर्षी पाऊस कमी झाला असून उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली. यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजूरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियेाजन संबधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले.आवश्यकतेनुसार  आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.


उजनी प्रकल्पात सध्या 5.34 टीएमसी (9.58 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी भिमा प्रकल्पाद्वारे सन 2022-23 मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र 2 लाख 54 हजार 253 हेक्टर (84.50 टक्के ) होते. अशी माहिती यावेळी देण्यात आली. 


अधीक्षक अभियंता धीरज साळी यांनी उपलब्ध पाणीसाठा, कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसूली, खरीप व रब्बी हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरित कालावधीसाठी पाण्याचे नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी समान पध्दतीने उपलब्ध पाणी वाटप करण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. माढयाचे आमदार बबनदादा शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख, कृष्णा खेोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले  हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.