पंढरपूर : सोलापूर , पंढरपूर , सांगोला आणि मंगळवेढा या शहरांसह जवळपास 125 खेड्यांची तहान भागवण्यसाठी उजनी धरणातून (Ujani Dam) पाणी सोडण्यात आले आहे. तर शनिवार (23 सप्टेंबर) रोजी सायंकाळी हे पाणी पंढरपूरच्या (Pandharpur) वेशीवर पोहचले. पंढपुरातील गुरसाळे बंधाऱ्यात हे पाणी पोहचलं असल्याची माहिती देण्यात आलीये. सुरुवातीला संथ गतीने सुरु असलेल्या पाण्याचा प्रवास हा अखेरच्या टप्प्यात मात्र थोडा वेगवान झाल्याचं पाहायला मिळालं. उजनीपासून प्रवास सुरु करत सात बंधाऱ्यांमध्ये थांबा घेत हे पाणी अखेर पंढपूरच्या अलीकडे असलेल्या गुरसाळे बंधाऱ्यामध्ये पोहचले. 


उजनीपासून गुरसाळे धरणाचे अंतर हे 108 किलोमीटर आहे. हा बंधारा भरल्यानंतर रविवार (24 सप्टेंबर) पहाटे हे पाणी पंढरपूरच्या बंधाऱ्यात पोहचणार आहे. पंढरपूरचा हा बंधारा भरल्यानंतर या पाण्याचा प्रवास हा चंद्रभागेतून मंगळवेढा मार्गे सोलापूरच्या दिशेने सुरु होईल. हे पाणी गुरसाळे बंधाऱ्यात पोहचलेल्या या पाण्याला बंधारा भरण्यासाठी चार ते पाच तासांचा अवधी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रविवार (24 सप्टेंबर) रोजी पंढरपूर शहर , सांगोला शहर , 81 गावाची शिरवावी पाणीपुरवठा योजना आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणी पुरवठा योजनेस पाणी पुरवठा करण्यात येईल. यामुळे पुढील दोन महिन्यांकरिता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 


चंद्रभागेची दुरावस्था


उजनीचे हे पाणी चंद्रभागेमध्ये येऊन पंढरपुराला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पण सध्या याच चंद्रभागेची दुरावस्था झाल्याचं चित्र आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात पंढरपूरकरांना पाणीकपात सहन करावी लागतेय. पण यापेक्षा धक्कादायक म्हणजे  शहराच्या उपनगरातील ड्रेनेजचे पाणी मिसळते त्याच्याच शेजारी शहराला पाणी पुरवठा करणारे पम्पिंग स्टेशन आहे. त्यामुळे दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन नागरिकांना आणि भाविकांना जवळपास महिनाभर हेच पाणी प्यावे लागत असल्याचं समोर आलं आहे.  दुर्दैवाने उपनगरात जमा होणारे पाणी थेट चंद्रभागेत मिसळत असल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनला हेच पाणी पोहचते. 


दरम्यानयाबाबत पालिकेचे माजी नगरसेवक आणि संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष किरणराज घाडगे यांनी प्रशासनाला हे पाणी तातडीने बंद करण्याचा इशारा दिलाय. सध्या चंद्रभागेत पाणी नसले तरी गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेला पाणी पुरवठ्यात हे दूषित पाणी मिसळते. त्यामुळे दूषित पाणीच शुद्ध करुन नागरिकांना प्यावे लागत असल्याचा दावा घाडगे यांनी केला आहे .  तर हे आंदोलन तातडीने थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. 


हेही वाचा : 


Pandharpur News : उजनीचे पाणी पोहचण्यापूर्वी बाल वारकऱ्यांनी केली चंद्रभागेची स्वच्छता, नदी अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी