Ujani Dam Accident: सोलापूर : लोकसभा (Lok Sabha Election 2024) प्रचाराची धूम सुरू असताना एका बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. तारीख होती 21 मे वेळ संध्याकाळी साडे पाचची. उजनी जलाशयातील (Ujani Dam) अवैध प्रवासी वाहतुकीनं या दिवशी सहा निष्पाप जीवांचे बळी घेतले. मात्र, याला तब्बल 19 दिवस उलटूही अजून प्रशासनानं साधा गुन्हा दाखल करण्याचं सौजन्य दाखवलेले नाही. यामुळेच आता सामाजिक कार्यकर्ते चिडून उठले असून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिली आहेत. पण त्यांच्याकडूनही दखल न घेतली गेल्यानं आता राष्ट्रीय मानवहक्क विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


करमाळा तालुक्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे उजनी जलाशयातून असणाऱ्या शॉर्टकट मार्गानं गेले कित्येक वर्ष प्रशासनाच्या आशीर्वादानं अवैध प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. याच एका बोटीत झरे येथील गोकुळ जाधव, त्यांची पत्नी कोमल आणि त्यांची 2 वर्षांची मुलगी माही, एक वर्षांचा मुलगा शुभम एका धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्यासाठी उजनी जलाशयावर आले. याचवेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्षांचा मुलगा गौरव डोंगरे आणि त्याचे चुलत बंधू सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे देखील कळाशीकडे जाण्यासाठी कुगाव येथील जलाशयावर पोहोचले. त्यावेळी बोट घेऊन कुगाव येथील अनुराग अवघडे आला. यावेळी वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यातच हे सर्व सहा जण बोटीत बसले आणि बोट कळशीकडे निघाली. मात्र, निम्मं अंतर पार करून जातानाच वादळानं रौद्र रूप धारण केलं आणि जलाशयात मोठमोठ्या लाटा उठायला लागल्या. या लाटेतच बोटीला जलसमाधी मिळाली. 


यावेळी पोलीस अधिकारी राहुल डोंगरे यांच्यासह सर्वांनी आपले प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, लाटा एवढ्या मोठ्या होत्या की त्यात पोहणं अवघड झालं होतं. यातच पट्टीचा पोहणारा गोकुळ जाधव याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन लहान मुले असल्यानं त्यांनी स्वतःपेक्षा आपल्या दोन चिमुरड्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला. आईनं मुलीला कवटाळून धरलं तर बापानं मुलाला धरून वाचण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, यात सर्वच अपयशी झाले. सुदैवानं राहुल डोंगरे हे कसेबसे जिवाच्या आकांतानं पोहत पलीकडे असणाऱ्या कळाशी तिराजवळ पोहोचले. त्यांनी आरडा ओरडा केल्यावर त्यांना परिसरात असणाऱ्या ग्रामस्थांनी बाहेर काढलं. यावेळी राहुल यानं बोट बुडाल्याची माहिती ग्रामस्थांना दिल्यावर थोडं वादळ शांत झाल्यावर शोधमोहिमेला सुरुवात झाली. अंधार पडल्यानं रात्री केवळ यात कोमल यांची पर्स आणि लहान मुलांचे साहित्य सापडलं. यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यासाठी निरोप दिले. सात प्रवाशांपैकी बोट चालकासह सहा प्रवाशांचा पत्ता लागला नव्हता. 


दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 22 मे रोजी एनडीआरएफच्या टीमनं सकाळी लवकर शोधकाऱ्याला सुरुवात केली. दिवसभर शोधूनही केवळ 35 फूट खोल बुडालेली बोट आढळून आली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पुन्हा वादळी वारे वाहू लागल्यानं हा तपास थांबवण्यात आला. अखेर 23 मे या दिवशी म्हणजेच, तब्बल 40 तासानंतर पहिल्यांदा लहान मुलांचा मृतदेह फुगून वर आल्यानं या ठिकाणी शोध सुरू केल्यावर एकापाठोपाठ एक असे पाच मृतदेह आढळून आले. थोड्या अंतरावर गौरव डोंगरे याचाही मृतदेह सापडला. यानंतर हे सर्व मृतदेह करमाळा येथे पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले आणि संध्याकाळी या सर्व मृतदेहांवर झरे आणि कुगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


आता या घटनेला इतके दिवस उलटूनही अजूनही याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यानंतर सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तुषार झेंडे या सामाजिक कार्यकर्त्यानं सहा जणांचा बळी घेणाऱ्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेला जबाबदार असणारी बेकायदा प्रवासी जलवाहतूक आणि बोट मालक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याचसोबत या दुर्घटनेत झरे येथील जाधव कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानं हे कुटुंब उध्वस्त झालं आहे. गरीब कुटुंबातील बोट चालक अनुराग अवघडे याचाही मृत्यू झाल्यानं त्याचंही कुटुंब उघड्यावर आलं आहे. सर्वच मृतांच्या कुटुंबियांना शासनानं तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणीही तुषार झेंडे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 मे रोजी पत्र लिहून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं आता झेंडे यांनी राष्ट्रीय मानवहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली. तातडीनं मदत आणि कारवाईची मागणी केली आहे. किमान आता तरी शासनानं जागं होऊन तात्काळ गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करावी आणि कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा या निष्पाप बळींची किंमत शासनाला नाही, असंच म्हणावं लागेल.