Ujani Dam Water Level : मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात पावसामुळं (Rain) जनजीवन विस्कळीत देखील होत आहे. दरम्यान, या पावसामुळं नदी नाले तसेच धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायीनी असलेल्या उजनी धरणात (Ujani Dam) पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणानं निचांकी पातळी गाठली होती, ती आता वधारण्यास सुरुवात झाली आहे. 


 धरणात जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ


यंदाच्या भीषण दुष्काळी स्थितीमुळं उजनी धरण 44 वर्षाच्या नीचांकी पातळीला गेले होते. एका बाजूला चिंता वाढत चाललेली असताना गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरु झालेल्या पावसामुळं धरणात जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. यंदा उजनीने सर्वात नीचांकी म्हणजे वजा 59.99 टक्के पातळी गाठल्याने प्रशासन आणि बळीराजाची चिंता वाढली होती. यातच नीचांकी पातळीमुळे उजनीवरील सर्व योजना जवळपास बंद पडल्या होत्या. मात्र गेल्या चार दिवसापासून मान्सूनच्या आगमनाने जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 


दोन दिवसापासून उजनी धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात 


गेले काही दिवस सातत्याने घट होत असलेली पाणी पातळी पहिले दोन दिवस स्थिर राहिली.गेल्या दोन दिवसापासून उजनी धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.  सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात एक टीएमसी एवढे पाणी आले आहे. आज उजनी धरणाची पातळी वजा 58.30 इतकी वधारली आहे. यंदा समाधानकारक पावसाचे अंदाज हवामान खात्याकडून मिळाले असल्याने बळीराजा लवकरात लवकर उजनी धरण भरण्याची देवाला प्रार्थना करत आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरु झालेल्या पावसामुळे प्रशासनावरील ताण देखील कमी झाला आहे. 


उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं


उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं धरण आहे. कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील मोठं शेतीचं क्षेत्र बागायती आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचं महत्वं मोठं आहे. मात्र, मागील वर्षी उजनी धरण हे 64 टक्केच भरलं. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते, त्यावेळी पिकांनी पाणी मिळालं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची हातची पिकं वाया गेली. यावर्षी मात्र, हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


जून महिन्यात कसं असेल वातावरण? कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज