Pandharpur News : कोरोनाच्या (Corona) संकटानंतर अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले हजारो बेरोजगार झाले आणि मोठ्या शहरातून पुन्हा गावाकडे परतावे लागले. पण म्हणतात ना... गाव करी ते राव काय करी, या उक्तीप्रमाणे कोरोनाच्या संकटाला संधी समजून एका गावाने काम केले आणि आज ते स्वयंपूर्णतेच्या वाटेवर निघाले आहे. पंढरपूर वेळापूर या पालखी मार्गावर चिंचणी नावाचे एक छोटेसे गाव आहे. तसे सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणामुळे विस्थापित झालेल्या या गावाचे पुनर्वसन पंढरपूर तालुक्यात करण्यात आले. इतर गावांप्रमाणे कोरोना काळात अडचणीत हेही गाव आले होते. मात्र या काळात गावाने एकी दाखवली आणि अडचणीत आलेल्या शेतीला जोडधंदा करण्यासाठी साऱ्या गावाने पर्यटन व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला.


गावातील स्त्रियांनी 55 तोळे सोने गहाण ठेवण्यासाठी दिले आणि निधीचा प्रश्न सुटला!


सह्याद्रीच्या कुशीत आयुष्य गेलेल्या या गावकऱ्यांनी आपल्या जिद्दीवर चिंचणी या आपल्या गावाला देखील निसर्गरम्य बनवण्यासाठी 15 एकराच्या गावठाणात तब्बल 9 हजार झाडांची वनराई फुलवली. शासनाने याची दाखल घेऊन चिंचणीला वनश्री पुरस्कार देखील दिला. पण आपल्या गावातील निसर्गरम्य वातावरणाचा फायदा घेत ग्रामीण पर्यटन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. केवळ 65 उंबऱ्याच्या चिंचणी ग्रामस्थांनी निसर्ग पर्यटनाचा आराखडा बनवला. मात्र यासाठी पैसे मोठ्या प्रमाणात लागणार असल्याने पुन्हा घोडे अडले. मात्र गावातील स्त्रियांनी यातून मार्ग काढत आपल्या जवळील 55 तोळे सोने गहाण ठेवण्यासाठी दिले आणि निधीचा प्रश्न देखील सुटला. मग काय गेल्या सहा महिन्यांपासून सुरु झालेले काम पूर्ण झाले आणि चिंचणी पर्यटन केंद्राची सुरुवात झाली.


रोजची कामे, ताणतणाव यातून एक दिवस कुटुंबासमवेत निसर्गाच्या सानिध्यात घालवा अशा शब्दात चिंचणी ग्रामीण पर्यटन केंद्राची जोरदार चर्चा सुरु झाली आणि केवळ एका महिन्याच्या आत आता पश्चिम महाराष्ट्रातून चिंचणीकडे रोज भारी गाड्यांची रांग लागू लागली आहे. सध्या हुरड्याचा सीझन असल्याने गावरान हुरडा आणि रानमेव्याचा कुटुंबासमवेत आनंद लुटल्यास सध्या सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातून शहरी पर्यटक गर्दी करु लागले आहेत.


चिंचणी ग्रामस्थांकडून रोजच्या ताणतणावाचा शिणवटा घालवण्याची सोय 


रोजच्या ताणतणावात जगणाऱ्या शहरी कुटुंबाना एक दिवसाचा शिणवटा घालवण्याची खूप इच्छा असते आणि याच गरजेची सोय चिंचणी ग्रामस्थांनी केली आहे. सकाळी नऊ वाजता कुटुंबासमवेत चिंचणीला पोहोचलात की सुरुवातीला अस्सल गावरान नाश्ता आणि चहा देऊन पाहुण्यांचे स्वागत होते. त्यानंतर सुरु होते हिरव्यागार झाडीत आणि निसर्गाच्या सानिध्यात मस्त कुटुंबासमवेत भटकंती. पक्षांचा किलबिलाट, विविध फळाफुलांनी गर्द झाडी यातून पायवाट काढत शेतातून फिरताना मोबाईल फोनची साधी आठवण देखील होत नाही. मोबाईल निघतो तो फक्त निसर्गासोबत फोटो काढण्यासाठी.


थोडे दमल्यासारखे वाटेपर्यंत येतो ताजाताजा थंडगार ऊसाचा रस, बऱ्याच वेळ भटकंती केल्यावर ऊसाच्या रसाने थोडी हुशारी येते आणि मग सुरु होते हुरड्याची लगबग. आगटी शेजारी गावातील महिला गरमागरम लुसलुशीत गुळभेंडी हुरडा चोळून ताटात वाढत असतात. या लुसलुशीत हुरड्यासोबत दाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, काळे तिखट, गावरान गूळ, चुलीवर भाजलेले दाणे, सोबत गावरान गोडी शेव आणि रेवड्या असा फक्कड बेत सुरु होतो. सोबत उकडलेली लुसलुशीत कोवळी कणसे आणि शेतातील पपई, पेरु, कलिंगड, शेंदाडं, डाळिंब, द्राक्षे, बोरं, ढाळा असा रानमेवा .. हुरड्यावर पाणी पिऊ नका सांगत थंडगार मठ्ठा यामुळे पाहुणे झाडाखाली जाऊन बाजेवर आडवे होतात. नंतर बैलगाडी आणि ट्रॅक्टर मधून गावाची सैर होते . 


दुपारी मग कोणी  सायकलीवर रपेट मारते  तर कोणी ओपन जिमखान्याच्या कसरत करते. महिला वर्ग उंच उंच झोके घेत जुन्या हवा असेल तर व्यायाम करायचा नसेल तर उंच उंच झोके घेत बालपणीच्या आनंदाची आठवणी सांगत राहतात. कोणी खोपेत जाऊन निसर्गाची गंमत पाहत असते तर  काही मंडळी आपले वय आणि प्रतिष्ठा विसरुन कुटुंबासमवेत डीजेच्या आवाजात मनमुराद नाचायचा आनंद घेत असतात. कोणी क्रिकेटचे साहित्य घेऊन तर कोणी व्हॉलीबॉल घेऊन खेळण्यात रमून जातात.


अस्सल गावरान जेवणाचा बेत


दिवसभर मनसोक्त आनंद घेतल्यावर पुन्हा पोटात भुकेची जाणीव होऊ लागते आणि मग सुरु होता अस्सल गावरान जेवणाचा बेत. बेसन, ठेचा, बैंगन, पातवड्याची आमटी, गव्हाची गुळात बनवलेली खिर आणि चुलीवरील गरमागरम भाकरीचा बेत जेवणात येतो. सकाळी सुरु झालेला दिवस कसा संपला हे कळूनच येत नाही तोपर्यंत संध्याकाळ होते. यानंतर निरोपाचा गरमागरम चहा घेऊन आपल्या कुटुंबासमवेत दिवसभर घालवलेल्या अनेक गोड आठवणी मनात साठवत परतीचा रस्ता धरतात. 


खरंच आयुष्यात एखादा दिवस असा घालवता यावा यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो आणि हीच गरज या चिंचणी ग्रामस्थांनी हेरली आहे. सुरुवात जरी गावाचा सोने गहाण ठेऊन झाली असली तरी आता रोज होत असलेल्या गर्दीमुळे संपूर्ण गावाला रोजगार तर मिळालाच शिवाय जोडीला नोटा येण्यास देखील सुरुवात झाल्याने ग्रामस्थ खुशीत आहेत. चिंचणीने सुरु केलेल्या प्रकल्पाला स्थानिक आमदार बबनदादा शिंदे यांनी शासकीय योजनांची जोड देण्यास सुरुवात केली असून आता गावाला बी वर्ग दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. चिंचणीच्या एक दिवसाच्या आऊटिंगमुळे रोजचा ताणतणाव संपून मोठी ऊर्जा घेऊन परत जात असल्याचे महिलांना वाटते तर पुरुष मंडळी देखील निसर्गाच्या सानिध्यातील या एका दिवसाने भरपूर चार्ज झाल्याचे सांगतात. लोकांची गरज ओळखून चिंचणी या गावाने एकत्रित येत केलेला हा प्रयोग राज्यातील अनेक गावांना करता येण्यासारखा असून यातून गावाला रोजगाराच्या संधी आपल्याच गावात देता येणार आहेत.  तुम्ही कधी विठ्ठल दर्शनासाठी या भागात आला तर आपले टेन्शन ताणतणाव घालवण्यासाठी नक्की एकदा चिंचणीला नक्की भेट द्या.