मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर समाधान झालं, शिर्डीतलं आंदोलन मागे घेत असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. कोणत्याही तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी विरोध नाही, असंही ते म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहावर शिर्डीतल्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित केला होता. ठाकरे यांनी शिर्डीकरांना आज चर्चेसाठी बोलावलं होतं. यानंतर शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिकांनी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत समाधान झालं असल्याचं खासदार सदाशिव लोखंडे आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. आज शिर्डीकरांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असली, तरी पाथरीकरांना मात्र आजच्या चर्चेचं निमंत्रण नसल्याचं आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं होतं.


बैठकीनंतर खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, 'पाथरी येथे साईंचा जन्म झाला' हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे. पाथरीच्या विकासासंदर्भात निधी देण्यासाठी आमची हरकत नाही.

पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा असं नाव दिलेल्या आराखड्यातून साई जन्मस्थळ हा उल्लेख काढून टाकण्याचं मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत मान्य केलं. त्यामुळे शिर्डीकरांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र पाथरीकर यावर काय भूमिका घेतात यावर हा वाद पुढे चालू राहणार की मिटणार ते अवलंबून आहे. पाथरीच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपये जाहीर केले होते. त्या विकास आराखड्याच्या नावात साई जन्मस्थळ असा उल्लेख केल्यानं हा वाद निर्माण झाला होता. साईबाबांनी कधीच जन्मस्थळाचा उल्लेख केला नव्हता, त्यामुळे तो उल्लेख काढून टाकावा अशी मागणी करत शिर्डीकर संतप्त झाले होते. तर पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा दावा पाथरीकर करत होते. शिर्डीत याविरोधात आंदोलन छेडण्यात आलं होतं. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत बैठक बोलवली होती. या बैठकीत शिर्डीकरांचे समाधान करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले आहेत. मात्र आता पाथरीकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

जगाला 'सबका मालिक एक'चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे काल शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारत पाथरी साईबाबांचं जन्मस्थान असल्याचं संबोधत या परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा शिर्डीकरांनी जोरदार विरोध करत बंद पुकारण्यात आला होता.


काय आहे पाथरीकरांचा दावा?

पाथरीकरांनी दावा केला आहे की, साई संस्थाननं 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहे. मात्र हा उल्लेख पाथर्डी नावानं करण्यात आला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितलं आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचा देखील दाखला दिला आहे. ज्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरांतूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे.

परभणी जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये साई बाबांची नोंद
परभणी जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये साई बाबांची नोंद पाथरी गावातच जन्मल्याचा दाखला समोर आला आहे. परभणी जिल्ह्याचे 1964 चे गॅजेट हे मूळ इंग्रजी आवृत्तीत आहे. त्याचं महाराष्ट्र शासनानं 15 सप्टेंबर, 1988 ला मराठीत रुपांतर केलं. त्यात पाथरीचा उल्लेख पार्थपुरी असा आहे. ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन पाथरी झाले. त्याच गॅजेटमध्ये काहींच्या मते शिर्डीचे संत साईबाबांचं जन्म गाव आहे.

संबंधित बातम्या

साईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; पाथरीकरांना निमंत्रण 

Shirdi Saibaba | साई जन्मस्थळाच्या वादानंतर भक्तांची गर्दी दुप्पट, राज्यासह देशातील भक्तांच्या 

Shirdi Bandh | साई जन्मस्थळ वादाप्रकरणी चर्चेतून तोडगा काढू : अजित पवार