शिर्डी : सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर शिर्डीत दिवाळीच्या दिवशी दुहेरी दिवाळीचा आनंद साजरा करण्यात येत आहे. राज्य सरकारची घोषणा होताच ग्रामस्थांनी फटाके वाजवत व एकमेकांना पेढे भरवीत जल्लोष केला.


एकीकडे राज्य सरकारने घोषणा केल्यानंतर साई संस्थानही तयारीला लागलं आहे. एरवी 50 हजार भक्त दररोज शिर्डीत दर्शन घेत असत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सुरवातीला 6 हजार भविकच दर्शन घेऊ शकणार आहेत. ज्यांच्याकडे ऑनलाईन दर्शन पास असेल त्यांनाच दर्शन मिळणार आहे.


मंदिर सुरू झाल्यानंतर भाविकांनी गर्दी न करण्याचं आवाहन साई संस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे. तिरुपती बालाजी मंदिर संस्थानच्या धर्तीवर केवळ ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांना दर्शन दिले जाणार असल्याच स्पष्ट करण्यात आलं आहे. समाधी मंदिर व्यतिरिक्त प्रसादलाय, भक्त निवास कधी व कसे सुरू होणार याबाबत आज रात्री व उद्या बैठक घेतली जाणार असून यात सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.




कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणे भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे.  तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं.


Temple Reopen | सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरात भाविकांचा जल्लोष, पुण्यात साखर वाटप