सांगली : ऑगस्ट महिन्यात गेल्या चार वर्षांपासून पूर पाहणाऱ्या कृष्णा नदीची (Krishna River) यंदा मात्र परिस्थिती बिकट झाली आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच नदीची पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. पाऊस न झाल्यामुळे कोयना धरण देखील पूर्णतः अद्याप भरलेलं नाही. त्यामुळे गरज पडली तरच कोयनेतून विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात देखील पाऊस न झाल्यामुळे यादेखील भागांमध्ये सध्या टँकर सुरू झाले असून आता चारा छावणीचे देखील मागणी होऊ लागली आहे. यामुळे एकीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी खालावलेली असतानाच दुसरीकडे जिल्ह्याच्या पूर्व भागांमध्ये आता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


जत आणि आटपाडीमध्ये टँकर सुरू 


सांगलीत एकीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावली असताना दुसरीकडे पूर्व भाग देखील पाऊस न पडल्याने चिंतेत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, खानापूर आटपाडी कवठेमंकाळ या तालुक्याला दुष्काळी चटके जाणवू लागले असून जत आणि आटपाडीमध्ये जवळपास 21 पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी जिल्ह्यातील पूर्व भागातील परिस्थितीचा आढावा घेत टंचाई निवारणास प्राधान्य देत मागणीनुसार पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मागणीप्रमाणे टँकर वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. पूर्व भागातील तालुक्यातून सध्या चाऱ्याच्या मागणीबाबतही निवेदने येत आहेत. त्यानुसार आता पाण्याचे आणि चाऱ्याचेही नियोजन करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 


सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस 


पाऊसमान कमी झाल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात पाणी योजनांचा लाभ मिळत असला, तरी चारापाण्याची टंचाई काही भागात आहे. प्रशासन याबाबत योग्य त्या उपाययोजना करत आहे. मागणीनुसार पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार बैठकीत दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हणाले की, जिल्ह्यात यंदा पावसाचे माण खूपच कमी आहे. त्यामुळे तकऱ्यांनाही अडचणी येत आहेत. ऑगस्ट महिन्यातील पावसाचे प्रमाण घटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 


मागणीप्रमाणे टँकर वाढविण्याचा निर्णय


जिल्ह्यात सध्या 24 गावांत पाण्यासाठी 29 टँकर सुरु करण्यात आले आहेत. अजूनही मागणी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. पाणी योजनांचा आवर्तनाचा लाभ मिळणाऱ्या क्षेत्रातील इतर अडचणी सोडविण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या