तासगाव (सांगली) : तासगावमधील प्रसिद्ध श्री गणपती पंचायतनचा 244 वा रथोत्सव आज (20 सप्टेंबर) संपन्न होणार आहे. रथोत्सवादिवशी गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होते. 'मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात, अलौकीक व नयनरम्य सोहळ्यात हा रथोत्सव पार पडणार आहे. 


'मंगलमुर्ती मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात. गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमीटरवर असलेल्या श्री काशिविश्‍वेश्‍वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. रथ ओढण्यास सुरवात झाल्यानंतर गुलाल व पेढ्यांची झालेली उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांझपथक, समोर दिमाखात चालणारी ‘गौरी’ हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. 


तासगावचा रथोत्सव, भाविकांचे श्रद्धास्थान


महाराष्ट्राचे श्रद्धास्थान, देशभरातून दर्शनासाठी येणारे लाखो भाविक आणि 243 वर्षांची परंपरा असलेल्या तासगावचा ऐतिहासिक 244 वा रथोत्सव सोहळा बुधवारी पार पडत आहे. श्री गणेशाचे आशीर्वाद, भाविकांची अपार श्रद्धा, श्री गणपती पंचायतन देवस्थान संस्थानचे विश्वस्त आणि मानकरी यांचे भक्तिभावपूर्ण योगदान यामुळे या ऐतिहासिक परंपरेचा लौकिक वृद्धिंगत होत आहे. तासगावचे गणेशमंदिर हे दाक्षिणात्य स्थापत्यकलेचा वारसा म्हणूनच ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रात कुठेही आढळणार नाही असे गोपूर हे तासगावच्या गणेशमंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. त्याचबरोबर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती हेदेखील अनोखेपण म्हणावे लागेल.


परशुरामभाऊ पटवर्धनांनी तासगावमध्ये गणेशमंदिराची उभारणी केली. तासगावच्या गणेशोत्सवातील रथयात्रेला 244 वर्षांची परंपरा लाभली आहे. गणेशोत्सवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसात या गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. 1785 मध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरु करण्यात आली. यासाठी पाचमजली खास सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर 1971 सालापासून, सात टन वजनाचा, तीन मजली आणि तीस फूट उंचीचा लोखंडी रथ रथोत्सवासाठी वापरला जातो.


रथोत्सवासाठी दीड लाखाहून अधिक लोक


चार लोखंडी चाकावर सजवलेला आणि बाप्पांना विराजमान केलेला हा सात टन वजनाचा रथ 700 मीटरपर्यंत नेण्याचे काम मानकरी असलेला येथील वडार समाज मोठ्या भक्तिभावाने करत आहे. रथोत्सवासाठी दीड लाखाहून अधिक लोक येत असतात. उत्सवात सहभागी होणारा प्रत्येक भाविक, रथाला स्पर्श केल्याशिवाय, स्थाच्या चाकावर नारळ फोडल्याशिवाय जात नाही. त्यामुळे रथाजवळ मोठी झुंबड उडालेली असते. अशा परिस्थितीत देखील इतक्या वजनाचा रथ पुढे जात असताना, रथाच्या चारही चाकांना स्टेरिंगचा संबंध येत नसतानादेखील हा रथ निर्विघ्नपणे पुढे नेण्याचे काम, रथाच्या सूत्रसंचालन करणाऱ्या डॉ. आदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली मानकरी असलेले गाडी वडार समाजातील लोक करत असतात.


इतर महत्वाच्या बातम्या