Sangli Crime : दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या निर्दयी पतीनेच विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील कापूसखेड हद्दीत घडली. सुरुवातीला पतीने पत्नी ही मॉर्निंग वॉकला गेली असताना पाय घसरुन विहिरीत पडल्याचा कांगावा केला होता. मात्र, मुलीचे आई वडील व भाऊ यांच्या तक्रारीनंतर पोलीस तपासात विवाहितेला विहिरीत ढकलून दिल्याचे समोर आले. 


राजनंदिनी सरनोबत (वय 29) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव असून कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय ३०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. राजनंदिनीला एक सात वर्षाची मुलगी आहे. चार महिन्यांपूर्वी राजनंदिनीला मुलगीच झाली होती. त्यामुळे दोन्ही ही मुलीच झाल्याचा राग मनात धरून राजनंदिनीला कौस्तुभने विहिरीत ढकलून देत खून केला. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास कापूसखेड हद्दीतील हँग ओव्हर बिअर बार जवळील विहिरीत राजनंदिनीला ढकलले. 


त्यानंतर पतीने आपली पत्नी पाय घसरून विहिरीत पडल्याचे पोलीसांना सांगितले. मात्र, राजनंदिनीचा भाऊ व नातेवाईकांनी तिचा पतीनेच खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.


फिरायला घेऊन गेला आणि घात केला 


कौस्तुभ हा पत्नी राजनंदिनीला कापूसखेड रोडला पहाटे फिरायला मोटरसायकलवरून घेवून गेला होता. या रस्त्यावरील हँग ओव्हर बारजवळ असणाऱ्या पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कडेला नेवून तिला विहिरीत ढकलून दिले. रविवारी ही घटना घडल्यानंतर राजनंदिनी ही लघुशंकेसाठी गेली असता, विहिरीत पाय घसरून पडून तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीसांना कौस्तुभने दिली होती. मात्र, मुलीचे आई वडील व भाऊ यांच्या तक्रारीनंतर राजनंदिनी हिचा भाऊ मिलिंद नानासो सावंत यांनी राजनंदिनीचा खून पती कौस्तुभने केल्याची वर्दी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली.


इतर महत्वाच्या बातम्या