रत्नागिरी : साखरपा परिसरात दहशत माजवलेला बिबट्या आज जाधववाडी येथे गुरांच्या वाड्यात मृत अवस्थेत आढळून आला. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या वाड्यातील सामान काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुर्गंधी आली. त्याला वाड्यात बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. यानंतर वन विभागाला संपर्क करण्यात आला. 


येथील तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला आपल्या कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्राथमिक पाहणी करून मृत बिबट्याला बाहेर आणले. काल (शुक्रवारी) ज्या ठिकाणी तरुणावर हल्ला झाला होता, त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाड्यात बिबट्याचा मृत्यू झाला. काही दिवसापासून जखमी असलेला हा बिबट्या आसरा शोधत असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जखमी असल्याने तो जास्त अंतर पार न केल्याची शक्यता सांगितली. यानंतर त्या बिबट्याला देवरुख येथे नेवून शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


परिसरातील शेकडो नागरिकांची मृत बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती. वनविभाग सोबत पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित झाले होते. मृत झालेला हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे 5 वर्ष इतके त्याचे वय असल्याचा अंदाज आहे. वनविभागाच्या विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला, पोलीस खात्याच्या सहाय्यक निरीक्षक मुजावर मॅडम यांच्यासमवेत सुरज तेली, आकाश कुडूकर,सहयोग कराडे, अरुण माळी आदी कर्मचारी उपस्थित होते.



साखरपा जाधववाडी येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला 


साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत सकाळी घरगुती काम करणारा अमित जाधव या तरुणावर बिबट्याचा हल्ला केला. यात हा तरुण गंभीर जखमी झाला होता. तरुणाच्या हाताला व डोक्याला बिबट्याने  हल्ला केल्याने गंभीर जखम झाली.अचानक झालेल्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी होत आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वीच साखरपा जाधववाडी येथील लिंगायत नामक महिलेवर वाघाच्या हल्यात जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.