रत्नागिरी:  राज्याप्रमाणे आता स्थानिक पातळीवर देखील फोडाफोडी आणि कटशाहचे राजकारण होताना दिसून येत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटात राजकीय वर्चस्वासाठी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे एकमेकाच्या गटातील कार्यकर्ते, नेते यांना आपल्याकडे खेचण्याची एक स्पर्धाच दिसून येत आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. सत्तांतर झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कुणी शिंदेंसोबत गेले नाही. पण, असं असलं तरी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी येथील सभेत ठाकरे गटाच्या लांजा नगरपंचायतीतील (Ratnagiri lanja) नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. याकामी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किंग मेकर म्हणून ओळख असलेल्या किरण सामंत यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नगरसेवकांच्या साथीनं शिंदे गटानं ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. 10 एप्रिल रोजी मांडलेल्या या ठरावावर आज मतदान होणार आहे. त्यामुळे या अविश्वास ठरावाचा निकाल कुणाच्या बाजुनं जाणार? शिंदे का ठाकरे गट बाजी मारणार? याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. 


12 नगरसेवक अज्ञात स्थळी


दरम्यान, अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासह 12 नगरसेवक हे अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. अविश्वास ठरावा दरम्यान होणारी संभाव्य पळवापळवी, फाटाफुट या गोष्टी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. 


साळवी, राऊत यांना धक्का? 


दरम्यान, अविश्वास ठरावाचा निकाल काय लागणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या या ठिकाणी राजन साळवी आमदार आहेत. शिवाय, विनायक राऊत खासदार आहेत. आमदार म्हणून राजन साळवी यांनी पकड मजबूत मानली जाते. दरम्यान, आजचा अविश्वास ठराव कुणाच्या बाजुनं लागणार? याबाबत चर्चा रंगली आहे. मुख्य बाब म्हणजे अविश्वास ठराव ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यास आमदार राजन साळवी यांना धक्का मानला जाऊ शकतो. शिवाय, आगामी काळात स्थानिक पातळीवरील गणितं देखील बदलू शकतात. याचे पडसाद नगरपंचायतीच्या राजकारणात दिसू शकतात. 


महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचं असं वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं आहे. पण स्थानिक पातळीवरची गणित मात्र वेगळे असतात. त्यामुळे काही वेळेला वरचा नियम खालच्या राजकारणासाठी लागू होत नाही. शिवाय कार्यकर्त्यांनी नेते यांच्यातले मतभेद देखील यामागे असतात. तसंच काहीच चित्र आणि तीच स्थानिक राजकीय समीकरणे सध्या लांजा नगरपंचायतीमध्ये घडताना दिसून येत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजप आणि शिवसेना म्हणजेच शिंदे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे दोन नगरसेवक देखील अज्ञातस्थळी रवाना झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत झालेली स्थानिक पातळीवरची ही फाटाफूट आगामी काळात किमान लांजा नगरपंचायतीतील स्थानिक राजकारणात परिणामकारक ठरू शकतात.