Chiplun School Latest News : सह्याद्रीच्या पायथ्याशी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे प्रयोग भूमित अनाथांसाठी निवासी शाळा भरतेय. मागील 20 वर्षांपासून येथे अनाथांची शाळा भरत आहे.  ही नुसती शाळा नसून एक कुटुंबच आहे, असे म्हटल्यास वावगं वाटायला नको. 


अनाथांच्या या शाळेच्या इमारतीच्या आत प्रवेश करताच समोर आपल्याला पाहून मुलांचे निरामय निरागस चेहरे दिसतात. ही इमारतच त्यांचं विश्व आहे. या शाळेतच सर्वांचं उठणे आणि झोपणे होतं. इतकेच नाही तर  स्वतःच स्वयंपाक करणे, आजूबाजूचा परिसर साफ करणे..इतर कामात मदत करणे हेही येथील विद्यार्थी करतात. येथे पहिली ते सातवी पर्यंतचे तीन टप्प्यात वर्गवारी करून शिकवले जाते. पहिला वर्ग चिमुकल्यांचा इमारच्या बाहेरील पडवीतील चौथऱ्यावर भरतो. तर दुसरा वर्ग इमारतीच्या आतल्या खोलीत भरतो.. या आतल्या 15 बाय 20 च्या खोलीतच वर्ग भरतो आणि तीथेच मुलांचे दफ्तर आणि शालेय साहित्य असते. त्याच जागेत विद्यार्थी रात्री झोपतात. येथील मुले ही वेगवेगळ्या बोली भाषेतील असल्यामुळे तेथील शिक्षकांना मुलांना मराठी भाषेतून शिकविताना मोठी मेहनत घ्यावी लागते. 


शाळा सुरु होण्याच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर ही मुले स्वतःचे जेवण, नास्ता,चहा करणे.. अंगोळीसाठी पाणी तापवणे.. तसेच स्वत:ची भांडी धुण्यापासुन ते चुल पेटवण्यापर्यंत विद्यार्थी स्वतः करतात. 
वर्षेभर साजरे होणारे सण उत्सव दिवाळी इथेच साजरी केली जाते. या मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच शाळेबाहेरील ज्ञानाचे, व्यावसायिक, व्यावहारिक जिवनाचे धडेही दिले जातात. 


येथील डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी, कातकरी धनगर व इतर अठरापगड जातीची मुलं शिक्षणाबरोबर प्रशिक्षण घेत खरे जीवन शिक्षण अनुभवतात. येथे शिक्षण घेताना आतापर्यंतचा आलेला अनुभव संदीप निकम याने पुस्तकरुपी प्रकाशित केला आहे. 


आधुनिक जगाच्या शर्यतीत आपण मागे पडू नये, जगाची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी प्रयोग भूमीत मुलांना संगणकाचे प्रशिक्षणही दिले जाते. याच बरोबर या मुलांना परिसरातील शेती, भात शेती लावणी विविध लघु उद्योग, सह्याद्रीच्या पायथ्याशी उभारलेले छोटे प्रोजेक्टची माहिती दिली जाते. मुलांच्या अंगी विविध कला गुण असल्याचे येथे निदर्शनास येते. शाळा सुटल्यानंतर येथे ही मुले धमाल मस्ती हि करतात..गाणीही म्हणतात.. ही शाळा डोंगराळ भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने येथे मोबाईल नेटवर्कही नाही..आणि मुलांना मोबाईलचा छंदही नाही. येथे शिक्षणाबरोबर आयुष्य कसे जगायचं आणि जगण्यासाठी आपल्याला कश्या प्रकारे उभं राहयचं ती एक प्रकारची नवी उमेद, उभारी मिळते.