Ratnagiri Bus Accident : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गुहागरमध्ये (Guhagar) दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या. या धडकेत दोन्ही एसटी बसचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना RGPPL च्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.

 

गुहागर तालुक्यात आज सकाळी हा अपघात झाला. धोपावे-चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस विरुद्ध दिशेने येत होत्या. परंतु एका अवघड वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही चालकांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस एकमेकांवर आदळल्या. अपघात एवढा भीषण होता की, एसटी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, ज्यात दोन्ही बसमधील चालकांना गंभीर दुखापत झाली. तर दोन्ही बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दोन्ही बसच्या चालकांना RGPPL च्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तर इतर जखमींवरही उपचार सुरु करण्यात आले.

 


कोकणात पावसाची संततधार सुरुच


रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. तर तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संतातधार सुरु आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे.  संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तिलारी धरणातून तिलारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.