मुंबई: आजची सर्वात मोठी राजकीय बातमी म्हणजे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या एसीबी चौकशीची. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज एसीबीनं राजन साळवींच्या (Rajan Salvi) घराची तब्बल साडे सहा तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात येत आहे. राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाचाही समावेश आहे.


आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका आमदार राजन साळवींनी घेतली आहे. राजन साळवी यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.


पत्नीसह मुलाचंही आरोपी म्हणून नाव


एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. राजन साळवी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 118 टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आरोपी म्हणून राजन साळवी, त्यांच्या पत्नी आणि मुलाचंही नाव नमूद करण्यात आलं आहे. 


काय म्हणाले राजन साळवी 


एसीबीकडून गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी दोषी नाही, त्यामुळे अटकपूर्व जमिनासाठी कोर्टात जाणार नाही. ठाकरेंसोबत राहिल्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती. त्यामुळे आपली चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आहे. अशा अटकेला आपण घाबरत नाही.


काय आहे राजन साळवी यांच्यावर आरोप?


ऑक्टोबर 2009 ते २ डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे. 


यापूर्वी राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


ही बातमी वाचा :