Parshuram Ghat : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) नागमोडी वळणाचा चिपळूणनजीक परशुराम घाट (Parshuram Ghat) आहे. महामार्गावरील हा घाट जवळपास तीन किलोमीटरचा असला तरी गेल्यावर्षी पावसामुळे याच घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोकेदुखी बनला होता. याच एकमेव कारण म्हणजे संथ गतीने सुरु असलेले घाटातील चौपदरीकरणाचे काम आहे. कामावेळी अर्धवट केलेल्या डोंगर कटाईमुळे पावसाळ्यात या डोंगराची माती, दरड महामार्गावर येऊन वाहतूक ठप्प होते. गेल्या पावसाळ्यात तर आठ वेळा दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. कामासाठी  घाट दोन महिने बंद करण्यात आला होता.


चौपदरीकरणाचं बहुतांश काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्याचा अंदाज


पाऊस थांबल्यानंतर या घाटाच्या कामासंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले आहे. सबंधित प्रशासन आणि चिपळूणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या तत्परतेने घाटाच्या कामाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. घाटातील रुंदीकरणाच्या कामालाही गती घेत दिवस रात्र काम सुरु ठेवण्यात आले आहे. घाटाच्या मध्यापर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता अतिशय धोकादायक असलेला दरडीच्या डेंजर झोनमध्ये संरक्षण भिंतीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम मार्गी लावण्याची शक्यता आहे.


परशुराम घाट अत्यंत अवघड टप्पा


महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाट अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे 22 मीटर उंचीच्या डोंगरउतार आणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढेगाव असल्याने येथे डोंगर खोदाईसह अन्य कामे करणे अवघड असतानाही एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले. वर्षभरापूर्वी याच घाटात डोंगर खोदाई करतात. पोकलेन दरडीखाली सापडून चालकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरु ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायथ्यालगत असलेल्या गावाला सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 450 मीटर लांबीची आणि दुसरी सुमारे दहा मीटर उंचीच्या संरक्षित भिंतीचे काम पूर्ण केले. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता सुरक्षित झाला मात्र आता घाटात अतिशय धोकादायक टप्पा मानला जातो. दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात आहे.