Raigad Rain : आज रायगडात मुसळधार पाऊस कोसळला आहे. काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहायला मिळतंय, यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत.  किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप आलं आहे, त्यामुळे यावरुन खाली उतरणं देखील कठीण झालं आहे.


रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटक अडकले


आज अनेक पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले, त्यामुळे येथील अडकलेले पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या पायऱ्यांवरील वाट काढत मार्ग काढू लागले. आता कसेतरी हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरुप बाहेर पडले आहेत. मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये, असं आवाहन सध्या करण्यात येत आहे.


 



राज्यासह कोकणात पावसाची जोरदार हजेरी


राज्यातील (Maharashtra Rain Updates) अनेक भागांत मुसळधार पाऊस (Rain Latest Updates) कोसळत आहे. पावसाच्या जोरदार सरींनी अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai Rains), ठाणे, नवी मुंबई, कल्णाय परिसरांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी सकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. यासोबतच कोकणातही जोरदार पाऊस पडत असून आज दिवसभरात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. कोकणातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.


शाळांना सुट्टी जाहीर                            


रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर आहे. आज दिवसभर जोर कायम राहील अशीच एकंदरीत शक्यता सध्याचं वातावरण पाहता दिसून येत आहे. रविवारी दिवसभर पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलं. आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. एकंदरीत पावसाचं वातावरण पाहता आज जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.


रत्नागिरीत नद्यांची पाणीपातळी वाढली


रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं पुरतं झोडपून काढलं आहे. सोशल मीडियावर मुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढल्याचं दिसत आहे. राजापूर तालुक्यातील पूर्व भागांत आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या काही गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर या भागातील नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे. खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली असून नदीकिनारीच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 


हेही वाचा:


मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकल सेवेवर परिणाम; पश्चिम-मध्य-हार्बर रेल्वेवर सध्या परिस्थिती काय?, जाणून घ्या