पुणे : शिरूर लोकसभेचे माजी खासदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी शिवसेनेत परत यावं अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे. आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी येथील जनता दरबारावेळी शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Eknath Shinde) हवेली तालुका अध्यक्ष विपुल शितोळे यांनी आढळराव पाटील यांना पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली. त्यामुळे आढळराव आता परत स्वगृही जाणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 


आढळराव पाटील यांनी लांडेवाडीमध्ये जनता दरबार भरवला होता. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना परत पक्षात येण्याची विनंती केली. आम्हाला तुमची गरज असून दादा तुम्ही परत या अशी आर्त हाकच कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांना मारली. कार्यकर्त्यांचं यावेळचं प्रेम पाहून आढळराव पाटीलही भारावून गेले होते. 


अमोल कोल्हे यांच्याकडून मोठा पराभव


शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर त्यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती. पण शरद पवार गटाच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा मोठा पराभव केला. 


राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकाही फेरीत आघाडी घेता आली नाही. अखेर अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.


ही बातमी वाचा: