Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (10 जून) मतदान पार पडणार आहे. सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता असल्याने एक एक महत्त्वाचं आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप राज्यसभेच्या मतदानासाठी मुंबईत येणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. लक्ष्मण जगताप महामार्गाद्वारे अॅम्ब्युलन्समधून मुंबई गाठणार आहेत. दरम्यान आजारी असल्याने लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत आणण्यासाठी रस्तेमार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवण्यात आली होती.


आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी जिकिरीचं ठरेल. त्यामुळे कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने अखेर ते मतदानाला जाणार हे निश्चित झालं आहे. 


लक्ष्मण जगताप महामार्गाद्वारेच मुंबईला जाणार : आमदार शंकर जगताप
आमदार लक्ष्मण जगताप हे महामार्गाद्वारेच मुंबईला मतदानासाठी जातील. अॅम्ब्युलन्समधूनच ते प्रवास करतील. एअर अॅम्ब्युलन्सही तयार ठेवलेली होती, मात्र हवामानात वारंवार बदल होत असल्याने डॉक्टरांनी महामार्गाने जाण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली आहे.


खबरदारी म्हणून एअरलिफ्टची सुविधाही तयार होती 
आमदार लक्ष्मण जगताप बाय रोड प्रवास करणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली होती. परंतु लक्ष्मण जगताप यांच्यासाठी आता बाय रोडसह एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली होती. कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून प्रवासासाठी दोन्ही सुविधा उपलब्ध करुन ठेवल्या होत्या. रस्तेमार्गाने प्रवास करणं सुरक्षित वाटत नसल्यास एअर लिफ्ट करुन लक्ष्मण जगताप यांना मुंबईत आणलं जाईल. राज्यसभा निवडणुकीचं मतदान करुन ते पिंपरी चिंचवडला परत जातील.


राज्यसभेसाठी आज मतदान; संध्याकाळी 7 वाजता निकाल
राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत. 


दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना आणि भाजपनं (BJP) आपापल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं आहे. 


सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात 
विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.


राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला म्हणजेच, आज होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यातच महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. त्यामुळे आपल्याला मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज केला होता. आता त्यांना मतदान करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. 


संबंधित बातम्या


Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेसाठी एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा, पडद्यामागे काय घडलं?


Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेसाठी आज मतदान; संध्याकाळी 7 वाजता निकाल, सहाव्या जागेसाठी मोठी चुरस