पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात नक्की कोणी केली याचा वाद उफाळून आला आहे. या वादातून पुणे महापालिकेने उत्सवासाठी तयार केलेला लोगो बदलण्याची वेळ आली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.


लोकमान्य टिळक विरुद्ध भाऊ रंगारी असा वाद पुण्यात पुन्हा एकदा सुरु झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा 125 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं पुणे महापालिकेनं जंगी कार्यक्रमाचं आयोजनही केलं आहे. या कार्यक्रमाच्या लोगोवरुन आता वादाला तोंड फुटलं आहे.

यंदा पालिकेच्या लोगोमध्ये ना लोकमान्य टिळकांचा फोटो आहे ना भाऊ रंगारींचा. मात्र पालिकेच्या कार्यक्रमात भाऊ रंगारींचा फोटो लावा अशी मागणी रंगारी मंडळाकडून सुरु झाली आहे.

पहिला गणपती कुणी बसवला या वादाला खरं तर मागील वर्षीच सुरुवात झाली होती. भाऊसाहेब रंगारींनी 1892 साली पुण्यात पहिला सार्वजनिक गणपती बसवला. 1893 साली भाऊ रंगारींसोबत कृष्णाजी खासगीवाले आणि गणपतराव घोटवडेकर यांनीही त्यांच्या परिसरात सार्वजनिक गणपती बसवण्यास सुरुवात केली.

लोकमान्य टिळकांनी या उपक्रमाचं केसरीमध्ये अग्रलेख लिहून अभिनंदन केलं. 1894 साली लोकमान्य टिळकांनी स्वत: राहात असलेल्या विंचुरकर वाड्यात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, असा भाऊसाहेब रंगारी मंडळाचा दावा आहे.

दुसरीकडे लोकमान्य टिळकांचे चरित्रकार डॉ. सदानंद मोरे यांनी मात्र टिळकांमुळेच गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सार्वजनिक झाल्याचा दावा केला आहे.

गणेशोत्सवाची सुरुवात टिकळांनी केली असो किंवा भाऊसाहेब रंगारींनी त्यांचा उद्देश होता तो देशात ऐक्य प्रस्थापित करण्याचा. पण त्यांच्या अनुयायांकडून सध्या ज्या पद्धतीनं वाद घातला जातोय. त्यामुळे या महारुषांच्या एकतेच्या शिकवणीलाच हारताळ फासला जात आहे का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.