Pune: छेडछाड आणि विनयभंग प्रकरणी आरोपीला 72 तासांत दोषी ठरवून शिक्षा ही सुनावण्यात आलीये. पुणे सत्र न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय निकाली काढला. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलिसांनी 36 तासांत चार्ज शीट दाखल केल्याने आणि न्यायाधीश श्रद्धा डोलारे यांनी सलग तीन दिवस सुनावणी घेतल्यानं अवघ्या 72 तासांत हा ऐतिहासिक निकाल लागलाय. या निर्णयात आरोपी हॉटेल व्यावसायिक समीर श्रीरंग जाधवला 18 महिने सक्त मजुरीची आणि नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं पीडित महिलेच्या घरात शिरला आणि तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान, पीडिता प्रतिसाद देत नसल्यानं आरोपीनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी याप्रकरणी 25 जानेवारीच्या सायंकाळी पाच वाजता आरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंतांनी तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मुदळ यांच्याकडे सोपवला. तपास सूत्र हाती घेताच पीएसआय मुदळ यांनी आरोपीचा शोध सुरू केला. दुसरीकडे सबळ पुरावे आणि साक्षीदारांची जुळवाजुळव करून चार्ज शीट तयार ठेवली. 


अवघ्या 36 तासात आरोपीला अटक
27 जानेवारीला सकाळी साडे नऊ वाजता आरोपी समीरला बेड्या ठोकत त्याची वरात थेट न्यायालयात काढली. हिंजवडी पोलिसांनी अवघ्या 36 तासांत केस फास्ट ट्रॅक कोर्टात आणली. न्यायाधीश श्रद्धा डोलारे यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. पीडितेची बाजू सरकारी वकील विजयसिंह जाधवांनी मांडली. पहिल्याच दिवशी पीडित महिला, 7 वर्षाच्या मुलासह पाच साक्षीदार, पंच आणि तपास अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला गेला. उलट तपासणी देखील झाली. चार तासांच्या या सुनावणीनंतर 28 जानेवारीला आरोपीचा जवाब नोंदविण्यात आला. मग दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला आणि 29 जानेवारीला न्यायाधीश श्रद्धा डोलारे यांनी अवघ्या 36 तासांत केस निकाली काढली. न्यायाधीशांनी आरोपीला कलम 354 अन्वये 6 महिने, कलम 452 अन्वये 6 महिने, कलम  506 अन्वये 6 महिने अशी सक्त मजुरी आणि नऊ हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास पुन्हा एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. 


नायालयाच्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतूक
अवघ्या 72 तासांत हा ऐतिहासिक निर्णय लागल्यानं पिंपरी चिंचवड पोलीस आणि न्यायालयाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांनी देखील तपास यंत्रणेची पाट थोपटली. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी अशी धडाकेबाज कामगिरी गरजेची असते. साक्षीदार, पोलीस आणि न्यायालय या तिन्ही पातळीवर तातडीनं पावलं उचलली गेली की असे ऐतिहासिक निर्णय समोर येतात. यात शिक्षा कमी सुनावली असली तर इतर इसमांच्या मनात कायद्याचा धाक नक्कीच राहील आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, असा विश्वास आयुक्त कृष्ण प्रकाशांनी व्यक्त केला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha