पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जण करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतात. मात्र, मुळचे पुण्याचे असणारे सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम करतात.
अब्दुल रजा मूळचे हैदराबादचे आहेत. ते हैदराबादला राहायला गेलेले असले तरी दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात. अनेक वारकरी त्यांची सेवा घेण्यासाठी न चुकता येत असतात. या सेवेबाबत अब्दुल रजा म्हणतात की, वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो, आणि माझा मालिश करण्याचा व्यवसाय असल्यामुळे मी बनवलेल्या तेलाचे ब्रॅण्डिंग हे होत असते. म्हणून ह्या पंढरीच्या वारीच्या सणात दरवर्षी वारकऱ्यांचे सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो. सेवा हीच धर्म या भावनेने अब्दुल रजा गेले वीस वर्ष वारकऱ्यांची न चुकता सेवा करतात.
पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्तांची वारकऱ्यांशी गैरवर्तणूक
पुण्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आळंदी (Alandi) देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्या वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. श्री निरंजन नाथ यांनी वारकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
एका वारकऱ्याने या घटनेवर एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटले, "जेव्हा देवाच्या सेवकांना स्वतःला देवाचा मालक असल्याचा भ्रम निर्माण होतो, तेव्हा ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ उमगतो का?". याचा अर्थ, जेव्हा देवाची सेवा करणारे स्वतःलाच मालक समजायला लागतात, तेव्हा त्यांना खऱ्या ज्ञानाचा अर्थ कळतो का, असा प्रश्न आहे. या घटनेनंतर वारकरी समुदायाने मंदिर प्रशासनाकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वारकरी समुदायाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित विश्वस्तांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंदिर प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. भाविक आणि वारकरी वर्गातून मात्र ही घटना दुर्दैवी आणि अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदायातील ही निष्ठा आणि भावनेची परंपरा कायम राहावी, यासाठी मंदिर प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत, अशी मागणीही वारकरी आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.