पुणे : कपूर कुटुंबाने आपल्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि उत्कर्षात मोलाचे योगदान दिले आहे. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे कलाकार होते, असं राज्यपाल रमेश बैस यांनी प्रथम 'विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार' वितरण करताना म्हणाले.


श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम येथे आयोजित माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे तर्फे देण्यात येणारा प्रथम 'विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार' वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
 
राज्यपाल रमेश बैस म्हणाले, भारतीय चित्रपट क्षेत्राच्या सुवर्णयुगात राज कपूर यांच्यासारख्या महान कलाकाराचा उदय झाला. राज कपूर यांनी आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत अनेक वर्षे रुपेरी पडद्याची शोभा वाढविली. विविधरंगी भूमिकांद्वारे  त्यांनी प्रेक्षकांना हसविले, रडविले आणि प्रेम दिले. चित्रपटांच्या माध्यमातून त्या काळातील सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला.


बैस पुढे म्हणाले, त्यांच्या काळात भाषा आणि सांस्कृतिक विविधतेवर मात करत समाजातील विविध घटनांची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांनी समाजाला एकजूट केले होते. सामान्य माणसाशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या भूमिकांमधून सामान्य माणसाच्या आकांक्षा, त्याचा संघर्ष आणि सन्मान प्रतिबिंबीत झाला आहे. भारतासह रशिया, इजिप्त, मध्य पूर्व आशिया तसेच दक्षिण अमेरीकेतही त्यांचे चित्रपट गाजले. या पुरस्कारामुळे स्व. राज कपूर यांच्या स्मृती चिरंतन राहतील, असे त्यांनी सांगितले.


कपूर कुटुंबाची चित्रपट क्षेत्रात मोलाची कामगिरी


पृथ्वीराज कपूर यांच्यानंतरही कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी चित्रपट क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी किमान 300 पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय, निर्मिती, दिग्दर्शनाचे कार्य केले. भारतीय चित्रपटांच्या सुवर्णयुगात पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यासह अनेक अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, कथा लेखक आणि गीतकारांनी केलेले कार्य स्मरणीय आहे. रचनात्मक आणि कलात्मक अभिव्यक्तीचा तो काळ होता. याच काळातील चित्रपट मनोरंजनासोबत प्रेरणा देणारे होते. देशातील बदलत्या सामाजिक प्रश्नांचे आणि घटनांचे प्रतिबिंब त्या काळातील चित्रपटात दिसून येत होते. याच काळात राष्ट्रीय एकता बळकट करण्याचे महत्वाचे कार्य भारतीय चित्रपटांनी केले, असे राज्यपाल म्हणाले. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राच्या सुवर्ण युगाचा साक्षीदार असल्याचे समाधान आपल्याला लाभले असून स्व.राज कपूर यांच्या अभिनयाचा चाहता असल्याचेही बैस यावेळी म्हणाले.