Pune Fire :  पुण्यात अनेक कारणांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मार्केटयार्ड येथे मध्यरात्री गोडाऊनमध्ये आगीची घटना घडली आहे.  रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. मार्केट यार्ड परिसरात सर्वदूर धुरांचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाकडून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.  


जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साहय्याने कुलूप तोडत चारही बाजुंनी पाण्याचा मारा केला. गोडाऊनमध्ये कोणीही नागरिक अडकल्याची माहिती घेत त्यांनी पाण्याचा मारा सुरु केला. आग पसरु नये, याची जवानांनी काळजी घेतली आणि तासाभरात आग आटोक्यात आणली होती. यावेळी गोडाऊनमधे असलेले रद्दीचे कागद पुर्णपणे जळाले. घटनास्थळी गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो ही जळाले. आगीचे कारण समजू शकले नाही.


मार्केड यार्ड परिसरात पुण्यातील मोठी बाजारपेठ आहे. अनेक गोडाऊनदेखील आहेत. सगळे गोडाऊन एकमेकांना लागून असल्याने आगीची घटना घडली की आग पसरण्याचा मोठा धोका असतो. त्याच प्रमाणे बाजारपेठ असल्याने गोडाऊनमध्ये टेम्पोदेखील ठेवले असतात. काल लागलेल्या आगीमुळे टेम्पोही जळून खाक झाले आहेत. यात गोडाऊन मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.


आगीचं कारण अस्पष्ट


रात्री या गोडाऊनला आग कशामुळे लागली याचं कारणं अजूनही समजू शकलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. 


टिंबर मार्केट परिसरात लागली होती आग


दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात मोठी आगीची घटना घडली होती. लाकडाच्या गोडाऊनला आग लागली होती. या आगीत गोडाऊनमध्ये असलेल्या आगीत मोठं नुकसान झालं होतं. गोडाऊनच्या शेजारी असलेल्या घरांनादेखील आग लागली होती.  टिंबर मार्केटचा हा परिसर मोठा आहे. शेजारी लोकवस्तीदेखील आहे. या आगीमुळे शेजारी असलेल्या लोकवस्तीत खळबळ उडाली होती. साखर झोपेत असलेले नागरीक आगीचे लोट पाहून आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज ऐकून जागे झाले. या आगील सुमारे आठ घरांचं मोठं नुकसान झालं होतं. डोळ्यादेखत 8 कुटुंबियांचा अख्खा संसार उध्वस्त झाले . घरातील सगळं सामान जळून खाक झालं होतं. जवळच असलेल्या एका चार मजली इमारतीमधील (मातृछाया ) खिडकीच्या काचा आगीच्या तीव्रतेने फुटल्या व खिडकीचे कापडी पडदे, टेरेसवर असणारे  पत्र्याचे शेडदेखील जळून खाक झालं होतं. पुण्यातील लाकडी सामानाची मोठी बाजारपेठ असलेल्या टिंबर मार्केटमध्य़े आग लागल्याने किरकोळ विक्रेत्यांचं देखील नुकसान झालं होतं.