पुणे : पुण्याच्या सह्याद्री क्रीडा संकुलात शनिवारपासून मातीतल्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत पहिल्या दिवशी 57, 74, आणि 97 किलो वजनी गटाच्या कुस्त्या रंगल्या. त्यात महाराष्ट्राच्या जोतिबा अटकळेनं 57 किलो वजनी गटाचं कांस्यपदक पटकावलं.


जोतिबानं राजस्थानच्या शुभम सेनवर मात करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. जोतिबा हा मूळचा शेगावच्या धुमाला गावचा असून तो पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान आहे. 57 किलो गटात महाराष्ट्राचा आणखी एक पैलवान विजय पाटीलला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंग उपस्थित होते. याशिवाय यंदाचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखनंही स्पर्धेच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेत 32 राज्यातील पैलवान सहभागी झाले आहेत. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं मातीतल्या कुस्तीवर जागतिक मान्यतेची मोहोर उमटवल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघानं मातीतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचं यजमानपद महाराष्ट्राला बहाल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील पैलवानांनी महाराष्ट्र केसरीच्या प्रभावातून बाहेर यावं : ब्रिजभूषण शरण सिंग
महाराष्ट्र केसरीच्या प्रभावातून बाहेर येण्याची महाराष्ट्राच्या पैलवानांची तयारी नाही, असा आरोप कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग केला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांचा रोख इनाम आणि शासकीय नोकरीनं सन्मान व्हायला हवा. महाराष्ट्र केसरी जिंकला म्हणून शासकीय नोकरीची परंपरा योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.
खाशाबा जाधवांना 'पद्म' मिळावा ही मागणी दिल्लीत करणार असल्याचे ब्रिजभूषण शरण सिंग यांनी म्हटले. खाशाबांना पद्म देण्यात आलेला नाही, हे मला आज कळतंय. माझ्या हातात आता केवळ दहा दिवस आहेत. पण महाराष्ट्राचा आवाज मी दिल्लीत नेणार, असेही ते म्हणाले.